India China FaceOff: चीनविरुद्ध भारत युद्धाच्या तयारीत?; तिन्ही सैन्यदलाला शॉर्ट नोटीसवर सज्ज राहण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 10:20 AM2021-11-11T10:20:55+5:302021-11-11T10:29:06+5:30

India China Pakistan Clashes on Border: गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्यात सीमेवर तणावग्रस्त परिस्थिती आहे. अमेरिकेच्या गुप्तचर अहवालानंतरही ड्रॅगनचा छुपा डाव सगळ्यांसमोर आला आहे.

भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष कमी होण्याची कुठलीही चिन्हं दिसत नाहीत. चीन भारताला युद्ध करण्यासाठी उकसवत आहे का? असा प्रश्न यासाठी निर्माण होतो कारण भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सार्वजनिकरित्या तिन्ही सैन्यदलाला सतर्क राहण्याचे संकेत देत आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अगदी शॉर्ट नोटीसवरही कोणत्याही आकस्मित कारवाईसाठी तयार राहायला हवं असं म्हणाले आहेत. सध्या पाकिस्तान आणि चीन यांच्यासोबत भारताचे संबंध चांगले नाहीत. या दोन्ही देशामुळे भारताच्या सीमेवर तणावग्रस्त परिस्थिती आहे.

हवाई दलाच्या कमांडर कॉन्फरन्सची सुरुवात झाली. त्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बोलत होते. सीमेवर वाढणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्र्यांच्या विधानाला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. मागील १८ महिन्यापासून लडाख इथं दोन्ही देशांमध्ये तणाव आहे.

अलीकडेच भारतात ७ देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक पार पडली. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर ही बैठक होती. या बैठकीत पाकिस्तान, चीनने सहभाग घेतला नाही. भारतापेक्षा तालिबान या दोन्ही देशाला फायद्याचा वाटतो. तालिबानच्या माध्यमातून भारतात अस्थिरता पसरवण्याचा त्यांचा इरादा आहे. काश्मीर घाटीत सध्या त्याचे परिणाम पाहायला मिळत आहेत.

चीन हा भारतासाठी डोकेदुखी बनला आहे. कारण लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर भारताविरोधात रणनीती आखण्याचा ड्रॅगनचा डाव आहे. इतकचं नाही पाकिस्तान आणि तालिबान या दोन्ही देशाला चीन उघडपणे मदत करत आहे. त्यामुळे काश्मीर, लडाख आणि अरुणाचल प्रदेश या तिन्ही ठिकाणी भारताला एकाचवेळी लढाई करावी लागणार आहे.

सूत्रांच्य माहितीनुसार, सुरक्षा यंत्रणेशी निगडीत गुप्तचर खात्याने काही दिवसांपासून चीन आणि पाक सीमेवर सुरु असलेल्या हालचाली पाहता केंद्र सरकारला सतर्क केले आहे. त्याच आधारे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना तिन्ही सैन्य दलाला सतर्क राहण्याचे संकेत दिले आहेत. कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तर त्यात देशाचं हवाई दल सर्वात महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका निभावू शकतं.

राजनाथ सिंह म्हणाले की, भविष्यात जे कुठलंही युद्ध होईल त्यात वायूसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे वायूसेनेला आर्टिफिशियल इंटेलीजेंस, बिग डाटा हँडलिंग आणि मशीन लर्निंगच्या माध्यमातून क्षमता आणखी सशक्त करायला लागणार आहे.

तसेच देशाच्या सीमेवर ज्यारितीने तणावाची परिस्थिती आहे. ते पाहता आपल्या सशस्त्र दलाला शॉर्ट नोटीसवरही प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज राहण्याची गरज आहे असं संरक्षण मंत्री म्हणाले. चीन सध्या पाकिस्तानला जवळ करुन भारताविरोधात रणनीती आखत आहे.

अलीकडेच अमेरिकेच्या गुप्तचर खात्यानेही भारताला सतर्क करणारा अहवाल सादर केला आहे. विस्तारवादी भूमिका असलेल्या चीनने तिबेट गिळंकृत केलाच व आता त्याचा डोळा भारतातील काही भागांवर आहे. त्यामुळे चीनने सीमा भागात सध्या आपल्या हालचाली वाढविल्या आहेत.

सीमावाद सोडविण्याबाबत भारताचे मत मान्य न करता चीन आपली भूमिका पुढे रेटत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारताने हाती घेतलेल्या विकास प्रकल्पांमध्ये खो घालण्याचा प्रयत्न चीनकडून सातत्याने होत आहे. वादग्रस्त ठिकाणी असलेले आपले सैन्य मागे हटविण्यास चीन दिरंगाई करीत आहे.

अरुणाचल प्रदेश व तिबेट यांच्यातील वादग्रस्त सीमा भागात चीनने एक नवे गावच वसविले आहे. त्या गावात सध्या १०० लोक राहतात असा दावा अमेरिकेच्या संरक्षण खात्याने आपल्या वार्षिक अहवालात केला आहे. त्यामुळे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानावरुन भारत आणि चीन यांच्यात युद्धाची तयारी सुरु आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Read in English