अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 10:06 IST2026-05-12T10:00:05+5:302026-05-12T10:06:56+5:30
AIADMK Split: पक्षाचे अध्यक्ष ए. के. पलानीस्वामी यांच्या विरोधात बंड होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विधानसभेतही हे आमदार दोन गटात विभागून बसल्याचे दिसत होते.

अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अण्णाद्रमुक पक्षात फूट पडली असून, मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी टीव्हीके पक्षाला पाठिंबा देण्यावरून आमदारांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.
पक्षाचे अध्यक्ष ए. के. पलानीस्वामी यांच्या विरोधात बंड होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विधानसभेतही हे आमदार दोन गटात विभागून बसल्याचे दिसत होते.
२३४ पैकी ४७ जागा मिळवणाऱ्या अण्णाद्रमुक पक्षातील एक गट टीव्हीकेला पाठिंबा देण्यास तीव्र विरोध करत होता, तर दुसरा गट विजय यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला बाहेरून पाठिंबा देण्याच्या विचारात होता.
कीर्तनांची शपथ लांबली
तामिळनाडू विधानसभेत नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान नवीन मंत्रिमंडळातील महिला सदस्या सेल्वी एस. कीर्तना यांच्याकडे निवडून आल्याचे प्रमाणपत्रच नव्हते. त्यामुळे त्यांना शपथ घेता आली नाही. त्यांनी परत जाऊन प्रमाणपत्र आणले आणि नंतर शपथविधी झाला.
आमदाराने चुकून दिली दुसऱ्याचीच कागदपत्रे
दुसऱ्या एका आमदाराने चुकून आपल्या सहकाऱ्याची कागदपत्रे सादर केली होती. मात्र चूक लक्षात येताच मूळ कागदपत्रे सादर करून या आमदाराने शपथ घेतली. विधानसभेचे कार्यकारी अध्यक्ष एम. व्ही. करुपय्या यांनी सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.