BJP-NCP मध्ये केव्हा-केव्हा झाली 'सीक्रेट' बैठक? अजित पवारांनी केली शरद पवारांची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 09:10 PM2023-07-05T21:10:41+5:302023-07-05T21:24:50+5:30

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या भाजप नेत्यांसोबत झालेल्या सिक्रेट बैठकांवर भाष्य करत शरद पवारांची कोंडी केली आहे...

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आपापला दावा करणाऱ्या शरद पवार आणि अजित पवार यांनी बुधवारी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी 31 आमदार आणि चार एमएलसी अजित पवारांच्या समर्थनार्थ पोहोचले होते. दरम्यान, अजित पवार गटाने निवडणूक आयोगासमोर, शरद पवार यांच्याऐवजी अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यासंदर्भात मोठा दावा केला आहे.

तत्पूर्वी, मुंबई येथील एमईटी कॉलेजमध्ये झालेल्या अजित पवार गटाच्या बैठकीत अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्यावर संपूर्ण भडास काढली. एवढेच नाही, तर त्यांनी शरद पवार यांना वयाचा दाखला देत राजकारण सोडण्याचाही सल्ला देऊन टाकला. याशिवाय, त्यांनी राष्ट्रवादीच्या भाजप नेत्यांसोबत झालेल्या सिक्रेट बैठकांसोबतही भाष्य केले.

शरद पवारांचे सर्व 'सिक्रेट' एक-एक करून सांगितले - अजित पवार म्हणाले, 2014 मध्ये जेव्हा निवडणुकीचे निकाल आले. तेव्हा प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्यात काही चर्चा झाली आणि आपण भाजपला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे पक्षाने जाहीर केले. एवढेच नाही, तर आम्हाला वानखेडे मैदानावर शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासही सांगण्यात आले.

या शपथविधी सोहळ्यावेळी आम्हाला तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटले. त्यांनी मला विचाले, कसे आहात? साहेब कसे आहेत? यानंतर देवेंद्र फडणवीसांचे सरकार बनले. जर सरकारमध्ये सामील व्हायचेच नव्हते तर आम्हाला शपथविधी कार्यक्रमासाठी कशाला पाठवले?

अजित पवार म्हणाले, 2017 मध्ये काहीतरी वेगळे करण्याचा प्रयोग करण्यात आला होता. आम्हाला पुन्हा एकदा चर्चा करायला सागितले. आमच्या पक्षाच्या वतीने मी, जयंत पाटील आणि काही नेत्यांनी फडणवीस, मुनगंटीवार यांच्यासोबत चर्चाही केली. कोणता विभाग अथवा कोणते महामंडळ कुणाला मिळणार, हेही ठरले होते.

यानंतर, आमच्या वरिष्ठांनी सुनील तटकरे यांना दिल्लीला बोलावले. दिल्लीत भाजपने सांगितले की, आम्ही गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेसोबत आहोत. आपण भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार स्थापन करू. आमच्या वरिष्ठांना ते पटले नाही. त्यांचे म्हणणे होते की, शिवसेना जातीयवादी आहे आणि प्रक्रिया थांबली.

2019 मध्ये आम्हाला भाजप सोबत चर्चा करण्यास सांगण्यात आले होते. एक बड्या उद्योगपतीच्या घरी चर्चा झाली होती. आमचे वरिष्ठही तेथे उपस्थित होते. दुसरे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेलही तेथे उपस्थित होते. तेथे पुन्हा सर्व गोष्टी ठरल्या. यानंतर, आम्हाला पुन्हा सांगण्यात आले की, आपल्याला शिवसेनेसोबत जायचे आहे. 2017 मध्ये शिवसेना जातियवादी होती. मात्र 2019 मध्ये आम्ही सेनेसोबत कसे गेलो?

शरद पवारांची भाजप हायकमानसोबत झाली होती सिक्रेट बैठक - अजित पवार म्हणाले, पवार साहेब आणि तटकरे यांनी दिल्लीत भाजप हायकमांडची भेट घेतली होती. त्यावेळी भाजपने म्हटले होते, की आम्ही शिवसेनेला सोडू शकत नाही, तिघे मिळून सरकार स्थापन करू. मात्र पवार साहेबांना हे पटले नाही आणि आपण शिवसेनेसोबत सरकार स्थापन करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. यामुळे ही युती होऊ शकली नव्हती.

माझ्याच उपमुख्यमंत्री दालनात बैठक झाली होती, आम्ही सर्व ५३ आमदार होतो. आम्ही सर्वांनी पत्रावर स्वाक्षऱ्या करून, आपण सरकारमध्ये सहभागी व्हायला हवे, असे म्हटले होते. तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील आणि माझी एक समीती तयार करण्यात आली आहे. आपण भाजपच्या वरिष्ठ लोकांसोबत चर्चा करा. मात्र भाजपच्या वरिष्ठ मंडळींनी, फोनवर यासंदर्भात बोलणी होऊ शकत नाही, आपण इंदूरला या, असे सांगितले. यानंतर आम्ही तिकिटंही काढली होती.

...मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, आपण तिथे गेल्यास माध्यमांना कळेल. नंतर सांगण्यात आले जाऊ नका. तेव्हा एकनाथ शिंदे यांचा शपथविधी झालेला नव्हता. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, आपण इंदूरला आला नाहीत, तर पुढील चर्चा होऊ शकत नाही. माझा राज्यातील जनतेला विचारायचे आहे, माझ्याकडे ते पत्र आजही आहे. मलाच खलनायक का बनवले जाते? माझा दोष काय होता? पण आजही ते माझा दैवत आहे, असेही अजित पवार म्हणाले.