Raj Thackeray: "इफ्तारवेळी प्रेमाचा हात दिला, शिरखुर्म्यासाठी ते लायक नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 05:23 PM2022-05-03T17:23:08+5:302022-05-03T17:34:36+5:30

नमाज अदा केल्यानंतर जलील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेवर भाष्य केलं. देशात बंधू-भाव आणि शांतता नांदावी अशीच दुआ मी मागितली.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांसोबत नमाज अदा केली.

नमाज अदा केल्यानंतर जलील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेवर भाष्य केलं. देशात बंधू-भाव आणि शांतता नांदावी अशीच दुआ मी मागितली.

राज ठाकरे यांना मी आमच्या इस्लाम धर्मानुसार बंधू-भावाच्या उद्देशानं इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलं होतं. पण ते त्यांनी स्वीकारलं नाही. त्यानंतर औरंगाबादच्या सभेत त्यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली त्यानंतर ते आता बोलावण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत, असं इम्तियाज जलील म्हणाले.

राज ठाकरेंना इफ्तारीसाठी बोलावलं होतं. आता त्यांना ईदचा शिरखुरमा खाण्यासाठी बोलावणार का? असं जलील यांना विचारण्यात आलं असता त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला.

"राज ठाकरेंनी औरंगाबादच्या सभेत ज्या पद्धतीची भाषा वापरली ती पाहता आता ते शिरखुरमाचं निमंत्रण देण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत. त्यांना मी दुरूनच ईद मुबारक देतो", असं इम्तियाज जलील म्हणाले.

''शिरकुर्मा पिण्यासाठी बोलविण्याच्या लायक ते राहिले नाहीत. कारण, आम्ही अगोदर प्रेमाचा हात पुढे केला होता, पण ज्या पद्धतीच्या भाषेचा त्यांनी वापर केला.

आता, मला वाटते कुठेही त्यांनी जागा ठेवली नाही. म्हणून, मी दूरुनच त्यांना ईदच्या शुभेच्छा देतो,'' असे म्हणत खासदार इम्तियाज जलील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला.

देशाची नजर औरंगाबादकडे लागली होती, की औरंगाबादमध्ये काय परिस्थिती आहे. मात्र, येथील दोन्ही समाजाच्या लोकांनी आणि पोलिसांनी एकजूट दाखवून दिली.

पोलिसांनी त्यांचं काम अतिशय चांगलं केलं. तर, लोकांनीही त्यांना सहकार्य केलं. त्यामुळे, मी पोलिसांसह दोन्ही समजातील नागरिकांचे मनापासून आभार मानतो, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले.

राज ठाकरेंविरोधात कारवाईबाबत बोलताना इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारवरही ताशेरे ओढले. "राज ठाकरेंवर अजूनही एफआयआर दाखल का होत नाही हा प्रश्न मला पडला आहे, असं ते म्हणाले