२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 08:53 IST2026-04-25T08:51:45+5:302026-04-25T08:53:30+5:30
भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा (IOA) आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडे (OCA) अधिकृत प्रस्ताव

२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
नवी दिल्ली: भारताने २०३८च्या आशियाई क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषविण्यासाठी अधिकृतरीत्या आपली इच्छा व्यक्त केली आहे. देशाच्या ऑलिम्पिक संस्थेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. जागतिक स्तरावरील मोठ्या बहु-क्रीडा स्पर्धांचे केंद्र बनण्याच्या देशाच्या व्यापक रणनीतीच्या दिशेने टाकलेले हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) नुकतेच आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडे (ओसीए) २०३८च्या आशियाड स्पर्धासाठीचा आपला प्रस्ताव सादर केला आहे. ओसीएने २१ एप्रिल रोजी चीनमधील सान्या शहरात झालेल्या आपल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत भारताच्या या प्रस्तावावर चर्चादेखील केली आहे. विशेष म्हणजे, याच सान्या शहरात २२ एप्रिलपासून आशियाई बीच गेम्सला सुरुवात झाली आहे.
आयओएचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुराम अय्यर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले, "होय, आम्ही यजमानपदासाठी आमची इच्छा अधिकृतपणे व्यक्त केली आहे आणि ओसीएने कार्यकारी मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चाही केली आहे."
अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
भारतात २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद अहमदाबाद शहर भूषवणार आहे. तसेच, हेच शहर देशाच्या २०३६ ऑलिम्पिक दाव्यासाठीदेखील प्रस्तावित आहे. जर भारताला आशियाडच्या यजमानपदाची निविदा जिंकण्यात यश आले, तर गुजरातचे हे शहर २०३८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धाच्या आयोजनासाठी पुन्हा एकदा एक प्रबळ दावेदार म्हणून समोर येऊ शकते.
पुढील प्रक्रिया काय?
सध्याच्या स्थितीबाबत स्पष्टीकरण देताना अय्यर पुढे म्हणाले, "सध्या तरी ही केवळ यजमानपदाची इच्छा व्यक्त करण्याची प्राथमिक पायरी आहे. ओसीएने यावर प्राथमिक चर्चा पूर्ण केली असून, आता पुढे काय पावले उचलायची आहेत, याबाबत ते आम्हाला सूचित करतील. अधिकृत निविदा सादर करण्यासाठी सध्या कोणतीही निश्चित कालमर्यादा ठरवण्यात आलेली नाही."