राज्यातील धरणांपैकी पुणे विभागात केवळ ३३ टक्के पाणीसाठा; पाणी जपून वापरण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 17:07 IST2026-05-19T17:07:00+5:302026-05-19T17:07:37+5:30
पाऊस कमी पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला असून ऐन पावसाळ्यातही पाण्याची काटकसर करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे

राज्यातील धरणांपैकी पुणे विभागात केवळ ३३ टक्के पाणीसाठा; पाणी जपून वापरण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन
पुणे : राज्यात सध्या सर्व विभागांत मिळून सुमारे ३ हजारांहून अधिक धरणांमध्ये सध्या केवळ सुमारे ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होऊन धरणात पुरेसा साठा होईपर्यंत पाणी जपून वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. त्यात यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे अगदी ऐन पावसाळ्यातही पाण्याची काटकसर करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वाधिक पाणीसाठा अमरावती विभागात ४४.३९ टक्के साठा असून, सर्वांत कमी साठा पुणे विभागात केवळ २५.२६ टक्के साठा उरला आहे.
राज्यातील नागपूर, अमरावती, संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण या विभागांत मिळून एकूण ३ हजार २८ मोठे, मध्यम व लघु प्रकल्प समाविष्ट आहेत. त्यातही सर्वांत अधिक प्रकल्प छत्रपती संभाजीनगर विभागात असून, त्यांची संख्या ९२९ एवढी आहे. तर सर्वांत कमी प्रकल्प कोकण विभागात असून, त्याची संख्या १७३ एवढी आहे. यंदा उन्हाळा अत्यंत कडक आणि असह्य करणारा आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासूनच धरणांमधील पाण्याची बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर झाले तसेच सिंचन आणि नागरिकांना पिण्यासाठीदेखील पाण्याचा वापर वाढला आहे. त्यामुळे पाण्याचा उपसा वाढला. परिणामी धरणांमधील पाण्याची पातळी सरासरीपेक्षा खूपच खालावली आहे. पाण्याचा वापर जपून करण्याच्या सूचना जलसंपदा विभागामार्फत शेतकरी व नागरिकांना करण्यात आल्या आहेत.
विभागनिहाय पाणीसाठा (टक्क्यांत)
विभाग--- आजचा --- मागील वर्षीचा
नागपूर ---४२.६६ --- ३३.०४
अमरावती ---४४.३९---३९.३८
संभाजीनगर ---३८.३८--२८
नाशिक --- ३४.६०--- ३१.३६
पुणे --- २५.२६---- २२.२९
कोकण ---- ३७.७६--३८.२५
एकूण ---- ३३.९५--२८.९६