Neeraj Gunde: कोण आहेत नीरज गुंडे?; देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंशी नेमकं काय आहे 'कनेक्शन'?; वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 12:51 PM2021-11-01T12:51:13+5:302021-11-01T12:56:07+5:30

Nawab Malik Allegation on Uddhav Thackeray: मंत्री नवाब मलिक यांनी मागील सरकारच्या काळात नीरज गुंडे हा देवेंद्र फडणवीसांचा दूत म्हणून काम करायचा. बदल्यांपासून मंत्रालयीन कामांमध्येही नीरज गुंडेची महत्त्वाची भूमिका असायची असा आरोप केला.

मुंबई ड्रग्ज प्रकरणातील मुद्द्यानं आता वेगळं वळण घेतलं आहे. समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्या मंत्री नवाब मलिकांनी(Nawab Malik) आता ड्रग्स प्रकरणात भाजपाकडे मोर्चा वळवला आहे. मलिकांनी देवेंद्र फडणवीसांचे ड्रग्स प्रकरणी खळबळजनक आरोप केले आहेत.

माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या संरक्षणानेच राज्यात ड्रग्जचा धंदा सुरु आहे असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला. इतकचं नाही तर ड्रग्स पेडलर जयदीप राणा यांच्यासोबतचे फडणवीसांचे फोटो मलिकांनी ट्विटरवरुन जारी केले.

तसेच नवाब मलिकांनी मागील युती सरकारच्या काळात नीरज गुंडे(Neeraj Gunde) हा देवेंद्र फडणवीसांचा दूत म्हणून काम करायचा. पोलिसांच्या बदल्यापासून ते सर्व सरकारी कामं मार्गी लावण्यात त्याची भूमिका होती. मुख्यमंत्री कार्यालयात त्यांना डायरेक्ट एक्सेस असायचा आरोप फडणवीसांवर केला.

मलिकांच्या या आरोपावरुन देवेंद्र फडणवीसांनी नीरज गुंडे माझ्यापेक्षा जास्त उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या संपर्कात होता. मी नीरज गुंडे यांच्या घरी जायचो पण सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यापेक्षा जास्त त्यांच्या घरी गेलेत. नीरज गुंडे मातोश्रीवर अधिक जायचे सांगत मलिकांचे आरोप फडणवीसांनी फेटाळून लावले.

आता हे नीरज गुंडे कोण आहेत? याची चर्चा पुन्हा एकदा सर्वत्र सुरू झाली आहे. नीरज गुंडे यांचे आजोबा दादर परिसरात संघाचे संचालक होते. RSS मध्ये महिला समन्वयाची जबाबदारी नीरज गुंडेंच्या आत्या गीता गुंडे यांच्यावर होती. नीरज गुंडे हे उद्धव ठाकरे यांचे मित्र म्हणून ओळखले जातात.

भाजपाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांचे निकटवर्तीय म्हणून नीरज गुंडे प्रचलित आहेत. २०१९ च्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना-भाजपा यांच्यात तणाव निर्माण झाल्यानंतर नीरज गुंडे यांच्या माध्यमातून मातोश्रीसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला होता.

नीरज गुंडे हे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आहेत. युतीत तणाव निर्माण झाल्यानंतर गुंडे यांनी तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी केली होती. २०१४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना विरोधी बाकांवर बसली. परंतु गुंडे यांच्या घरी झालेल्या डिनर डिप्लोमसीनं शिवसेना-भाजपा एकत्र सत्तेत पुन्हा आले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात नीरज गुंडे यांच्या मध्यस्थीने चर्चेला सुरुवात झाली. राजकीय जीवनात प्रकाश झोतात नसलेले नीरज गुंडे यांनी शिवसेना-भाजपा युतीत महत्त्वाची भूमिका निभावली. नीरज गुंडे यांचे कॉर्पोरेट क्षेत्राशी चांगले संबंध आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नीरज गुंडे यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी सध्या संबंध खराब झालेत. सध्या राज्यात सुरु असलेल्या ईडी कारवायांबाबत नीरज गुंडे विविध माहिती ट्विटवरुन समोर आणतात. महाविकास आघाडीला अडचणीत आणणारे मुद्दे नीरज गुंडे यांच्या माध्यमातून पुढे येतात.

क्रिकेट क्षेत्रातही नीरज गुंडे यांनी बरेच काम केले असून त्यातील भ्रष्टाचार, अनियमितता बाहेर आणण्यासाठी नीरज गुंडे सक्रीय होते. भाजपा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या अनेक याचिकांमध्ये नीरज गुंडे यांच्या नावाचाही उल्लेख आढळतो. काँग्रेसचे घोटाळे बाहेर काढण्यात नीरज यांनी भूमिका निभावली.

नीरज गुंडे यांचे नाव अचानक पुन्हा चर्चेत आलं त्यासाठी कारण ठरलं नवाब मलिक. ड्रग्स प्रकरणात नवाब मलिकांनी आरोपांची मालिका सुरु केली आहे. त्याच NCB तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यापासून आता देवेंद्र फडणवीसांपर्यंत मलिक आरोप करत आहे. त्यातच नीरज गुंडे हा फडणवीसांचा निकटवर्तीय होता. फडणवीसांचे वाझे अशा शब्दात मलिकांनी नीरज गुंडे यांचा उल्लेख केला. त्यामुळे राजकीय आखाड्यात नीरज गुंडे हे नाव पुन्हा चर्चेत आलं.