आदिवासी, ओबीसी अन् ब्राह्मण मुख्यमंत्री; लोकसभेसाठी भाजपाने स्पष्ट केला अंजेडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 05:11 PM2023-12-12T17:11:35+5:302023-12-12T17:16:34+5:30

भाजपाने मध्य प्रदेशात OBC, छत्तीसगडमध्ये आदिवासी आणि राजस्थानमध्ये ब्राह्मण समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री केले आहे.

Lok Sabha Election: भारतीय जनता पक्षाने (BJP) मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान, या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावांची घोषणा केली आहे. मोहन यादव यांच्याकडे मध्य प्रदेशची, विष्णू देव साई यांच्याकडे छत्तीसगडची आणि भजनलाल शर्मा यांच्याकडे राजस्थानची धुरा सोपवण्यात आली आहे. यासोबतच भाजपने लोकसभा निवडणुकीबाबत आपला अजेंडाही स्पष्ट केला आहे.

नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली आणि आता सर्व भाजपची नजर आगामी लोकसभा निवडणुकांवर आहे. या विधानसभा निवडणुकीतून भाजपने त्यांचा लोकसभा निवडणुकीसाठीचा अजंडे स्पष्ट केला आहे. जातीय समतोल राखण्यासाठी भाजपने तिन्ही राज्यात तीन समाजातील व्यक्तींना मुख्यमंत्रिपद दिले आहे. याशिवाय, पक्षात दिग्गज नेत्यांऐवजी नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली जाईल, असाही एक संदेश पक्षाकडून दिला जातोय.

विष्णू देव साई-छत्तीसगडमध्ये आदिवासी मतदारांवर पकड मजबूत करण्यासाठी भाजपने विष्णू देव साई यांना मुख्यमंत्री केले. छत्तीसगडमध्ये आदिवासी मतदार निर्णायक मानले जातात. येथील एक तृतीयांश लोकसंख्या आदिवासी आहे. विधानसभेच्या 90 जागांपैकी 29 जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. याशिवाय राज्यात लोकसभेच्या 11 जागा आहेत. त्यापैकी 4 जागा आदिवासी समाजासाठी राखीव आहेत. याशिवाय छत्तीसगडमध्ये आदिवासी समुदायातील व्यक्तीला मुख्यमंत्री केल्यामुळे झारखंड आणि ओडिशासारख्या राज्यांवरही परिणाम होईल. तिथेही आदिवासी समाजातील लोक मोठ्या संख्येने राहतात.

मोहन यादव- काँग्रेस सातत्याने ओबीसीचा मुद्दा उचलत आहे, अशा स्थितीत मध्य प्रदेशात मोहन यादव यांना मुख्यमंत्री करून भाजपाने काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. दुसरीकडे ओबीसींची मते मिळवण्यासाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ओबीसींचे मत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अशा परिस्थितीत मोहन यादव यांना पुढे करुन भाजपाने हिंदी भाषिक राज्यांमध्ये ओबीसींना जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे.

भजनलाल शर्मा- राजस्थानमध्ये भाजपने भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान केले आहे. यासोबतच पक्षाने राज्यातील ब्राह्मण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. आकडेवारीनुसार राजस्थानमध्ये 89 टक्के हिंदू लोकसंख्या आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 18 टक्के आहे तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 13 टक्के आहे. याशिवाय, 7 टक्के ब्राह्मण समाज आहे. अशा स्थितीत भाजपने भजनलाल शर्मा यांना पुढे करुन ब्राह्मण आणि हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.