"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 09:09 IST2026-05-19T09:08:49+5:302026-05-19T09:09:58+5:30
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सध्याच्या युनूस सरकारला थेट आव्हान दिले आहे. "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच बांगलादेशात परतेन," असा इशारा त्यांनी दिला आहे.

"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
"मी देशात नाही याचा अर्थ मी गप्प बसले आहे असा मुळीच नाही. मी प्रत्येक क्षणी माझ्या देशासाठी लढत आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही सक्रिय आहे. माझ्या शांततेला कोणीही माझी कमजोरी समजू नये, मी खूप लवकरच बांगलादेशात परतेन..." विद्यार्थी आंदोलनानंतर बांगलादेशातून पळ काढावा लागलेल्या आणि सध्या भारतात आश्रयाला असलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सध्याच्या अंतरिम सरकारला थेट आव्हान दिले आहे. एका ई-मेल इंटरव्यूमध्ये त्यांनी बांगलादेशच्या सद्यस्थितीवर भाष्य करत मोहम्मद युनूस सरकारवर राजकीय छळ केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
२०२४ मध्ये झालेल्या हिंसक विद्यार्थी आंदोलनानंतर सत्ता गमवाव्या लागलेल्या शेख हसीना सध्या भारतात राहत आहेत. बांगलादेशातील 'इंटरनॅशनल क्राइम्स ट्रिब्यूनल'ने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, तर त्यांच्या 'अवामी लीग' पक्षावर बांगलादेशात बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
...तर बांगलादेशचा जन्मच झाला नसता!
अवामी लीग पक्षावर घालण्यात आलेल्या बंदीवर शेख हसीना यांनी कडक शब्दांत आक्षेप घेतला. त्या म्हणाल्या, "माझ्यावर आतापर्यंत १९ वेळा जीवघेणे हल्ले झाले, पण मी कधीच थांबले नाही. अवामी लीग हा जनतेचा पक्ष आहे, तो कोणत्याही कागदी आदेशाने संपवला जाऊ शकत नाही. जर अवामी लीगला बंदी घालून संपवणे शक्य असते, तर आज बांगलादेशचा जन्मच झाला नसता." आजही लाखो समर्थक आणि हजारो नेते पक्षासोबत ठामपणे उभे असून, अंतरिम सरकार अवामी लीगला घाबरते म्हणूनच त्यांनी पक्षावर बंदी घातली आहे, असा दावाही त्यांनी केला.
कधी होणार मायदेशी वापसी? शेख हसीना यांनी सांगितली अट
आपल्या मायदेशी परतण्याबाबत बोलताना शेख हसीना यांनी कोणतीही निश्चित तारीख जाहीर केली नाही. मात्र, त्यांनी एक महत्त्वाची अट ठेवली आहे. त्या म्हणाल्या, "माझी वापसी कोणत्याही ठराविक तारखेवर अवलंबून नाही. आधी बांगलादेशात लोकशाही वातावरण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, राजकीय अधिकार आणि कायद्याचे राज्य परत येणे गरजेचे आहे. हे केवळ माझ्या परतण्यासाठी नाही, तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि जनतेच्या हितासाठी आवश्यक आहे."
मोहम्मद युनूस यांच्यावर 'राजकीय नरसंहारा'चा आरोप
अंतरिम सरकारचे प्रमुख आणि नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांच्यावर शेख हसीना यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. युनूस सरकारने अवामी लीगच्या नेत्यांविरुद्ध 'राजकीय नरसंहार' सुरू केला आहे. आतापर्यंत पक्षाच्या सुमारे ६०० नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली असून, दीड लाखांहून अधिक लोकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून तुरुंगात टाकण्यात आले आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच युनूस सरकारने देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे संकटात ढकलली असून, त्यांच्या काळात वेगाने पुढे जाणारा बांगलादेश आता मागे पडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारत-बांगलादेश संबंधांवर महत्त्वाचे वक्तव्य
भारतासोबतच्या संबंधांवर बोलताना शेख हसीना यांनी भारताचे आभार मानले. "भारत आणि बांगलादेशचे संबंध ऐतिहासिक आहेत. भारत केवळ आमचा शेजारी देश नाही, तर आमच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात भारताचे योगदान खूप मोठे राहिले आहे. परंतु, बांगलादेशातील काही कट्टरपंथी आणि राजकीय गट नेहमीच भारतविरोधी राजकारण करत आले आहेत आणि सध्याचे मोहम्मद युनूस सरकारही नेमके तेच करत आहे," अशी घणाघाती टीका शेख हसीना यांनी केली आहे.