२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 08:27 IST2026-05-19T08:27:01+5:302026-05-19T08:27:37+5:30
NEET Exam Paper Leak : तपासादरम्यान शुभम खैरनार अनेकदा पुणे आणि अहिल्यानगर येथे गेल्याचे स्पष्ट झाले असून, प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर शुभम पुन्हा त्याच प्रवासाच्या दिशेने गेला असावा असा कयास बांधला जात आहे.

२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नीट पेपर फुटीप्रकरणी सोमवारी लातूर येथे शिवराज मोटेगावकर यांना अटक झाल्यानंतर नाशिकमधून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. २७ एप्रिलला दुपारी शुभम खैरनारच्या हाती नीटची प्रश्नपत्रिका पडली होती. त्यानंतर प्रश्नपत्रिकेचा डिजिटल प्रवास गुरुग्रामपर्यंत झाला. शुभमच्या हातात प्रश्नपत्रिका पडल्यानंतर तो दुपारपासून सुचिता नगरातील त्याच्या राहत्या फ्लॅटमधून गायब होता, अशीदेखील माहिती पुढे आली आहे.
तपासादरम्यान शुभम खैरनार अनेकदा पुणे आणि अहिल्यानगर येथे गेल्याचे स्पष्ट झाले असून, प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर शुभम पुन्हा त्याच प्रवासाच्या दिशेने गेला असावा असा कयास बांधला जात आहे. तपासात अटकेत असलेला संशयित धनंजय लोखंडे (२६, रा. राहुरी) हा शुभम खैरनारच्या संपर्कात टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून असल्याचे समोर आले आहे. लोखंडे यानेच २७ एप्रिलला शुभमकडे प्रश्नपत्रिका पोहोचविली होती. त्यानंतर शुभमने नाशिकमधील नीटच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ३ मे रोजी नीटची परीक्षा झाली, त्यापूर्वीच प्रश्नपत्रिका लीक झाल्याने देशभरात झालेली परीक्षा रद्द करावी लागली. ३ मेच्या दोन ते तीन दिवस अगोदर या प्रश्नपत्रिकेची विक्री कमी किमतीत झाली, तर २७ ते ३० एप्रिल या दरम्यान मात्र एक प्रश्नपत्रिका जवळपास १५ ते २० लाखांत विकली गेल्याचा संशय सीबीआयला आहे. त्यामुळे शुभमने प्रश्नपत्रिका विक्रीतून किती माया जमवली हे तपासातून स्पष्ट होईल. ज्या दिवशी १२ मे रोजी शुभमला सीबीआयने ताब्यात घेतले त्या दिवशी मात्र तो रात्री फ्लॅटमध्येच होता.
असा झाला नाशिकमधून पेपरचा प्रवास
तपास यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनसार, शुभमने २७ एप्रिलला प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर सर्वप्रथम उत्तर प्रदेशमधील संशयिताशी संपर्क साधला. त्यानंतर तो अहिल्यानगर आणि पुण्यात गेला, येथून त्याने पुन्हा नाशिक गाठले. याचदरम्यान शुभमशी हरयाणाच्या एका व्यक्तीने संपर्क साधला. त्यानंतर ती व्यक्ती १ किंवा २ मे रोजी नाशिकला आल्याची दाट शक्यता आहे. खैरनारने नीटची फुटलेली प्रश्नपत्रिका त्यास पुरविली. हरयाणातून पेपर राजस्थानच्या सिकरमध्ये गेला होता. येथून तो वेगवेगळ्या राज्यांमध्ये दोन दिवसांत वितरित झाला असावा, असे तपासात पुढे येत असल्याचे समजते.
सीबीआयचा तपास, कारवाई
या रॅकेटचे धागेदारे केवळ महाराष्ट्र पुरते मर्यादित नसून राजस्थान, दिल्ली, हरियाणा (गुरुग्राम) आणि मध्यप्रदेश अशा ५ राज्यांमध्ये पसरले आहेत.
सीबीआयने आतापर्यंतच्या धाडीत कोट्यवधी रुपयांचे बँक व्यवहार, संशयास्पद कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त केली आहेत.
तपास यंत्रणेनुसार, प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीच्या सदस्यांनीच हा पेपर लीक केला. पेपर महाराष्ट्र व इतर राज्यांत पसरवण्यासाठी एक मोठी साखळी कार्यरत होती.