CoronaVirus In Maharashtra: राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण? 'त्या' ९२ लाख लोकांनी वाढवलं सगळ्यांचं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 01:01 PM2021-11-25T13:01:40+5:302021-11-25T13:07:19+5:30

CoronaVirus In Maharashtra: लोकांच्या बेजबाबदारपणामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण मिळण्याची शक्यता

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. हाच आकडा आता १५ हजारांच्या खाली आला आहे.

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं वैद्यकीय यंत्रणेवर असलेला ताण कमी झाला आहे. मात्र लोकांच्या बेजबाबदारपणामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण मिळू शकतं.

आरोग्य प्रशासनानं लसीकरणाचा वेग वाढवला आहे. मात्र लसीकरणाबद्दल लोकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. कोरोना संकट टळलं या आविर्भावात लोक वावरत आहेत. त्यामुळे अनेकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे.

राज्यातील ९२.५ लाख लोकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. पहिला डोस घेतलेले लाखो लोक दुसऱ्या डोससाठी लसीकरण केंद्रावर जातच नाहीत असा अनुभव आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

कोविशील्डचा पहिला डोस घेऊन, दुसरा डोस चुकवलेल्या लोकांची संख्या ७७ लाख इतकी आहे. तर मुदत उलटूनही कोवॅक्सिनचा दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या १५ लाखांच्या घरात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानं अनेकांनी लसीकरणाकडे दुर्लक्ष केलं आहे. हा बेजबाबदारपणा महागात पडू शकतो.

दुसरा डोस चुकवलेल्या लोकांची यादी आरोग्य विभागाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. लसीकरण टाळणाऱ्या व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांना लस देण्याचा प्रयत्न आहे. कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसकडे नागरिक करत असलेलं दुर्लक्ष सर्वांसाठी अडचणीचं ठरू शकतं.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस विषाणूशी लढण्यासाठी शरीराला सज्ज करतो, तर दुसरा डोस एँटीबॉडी तयार करतो, ही बाब लोकांनी लक्षात घ्यायला हवी. त्यामुळे लोकांनी दुसऱ्या डोसकडे पाठ फिरवल्यास त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होणार नाहीत, असं डॉक्टरांनी सांगितलं.

राज्यात आतापर्यंत १८ वर्षांवरील ३९ टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर ७८ टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. दिवाळीसाठी बरेच लोक राज्याबाहेर गेले होते. त्यातील अनेकांनी दुसरा डोस घेतलाच नाही, अशी माहिती समोर आली आहे.

अनेकांना कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसचा विसर पडला आहे. तर बरेच जण आता कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असल्यानं दुसऱ्या डोसची गरज काय, असा विचार करून लसीकरणाकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

डिसेंबरमध्ये राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका आहे. मात्र या लाटेची तीव्रता कमी असू शकते. लोकांनी घाबरू नये. मात्र काळजी घ्यावी, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी काल केलं.

राज्यात डिसेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट डिसेंबरमध्ये येऊ शकते. मात्र तिची तीव्रता जास्त नसेल. राज्यातील लसीकरणाचा वेग चांगला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची तीव्रता फारशी नसेल, असं आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपेंनी म्हटलं.