"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 14:10 IST2026-05-05T14:10:06+5:302026-05-05T14:10:26+5:30
PM Modi reaction on Iran Attack on UAE Port: युद्धविरामानंतर पहिल्यांदाच इराणकडून हल्ला

"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
PM Modi reaction on Iran Attack on UAE Port: इराणकडून झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) फुजैराहमधील प्रमुख तेल उद्योग क्षेत्रात लागलेल्या आगीत तीन भारतीय जखमी झाले. ८ एप्रिलला अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामाची घोषणा झाली होती. त्यानंतर शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. फुजैराह मीडिया ऑफिसने एका निवेदनात म्हटले आहे की, फुजैराह तेल उद्योग क्षेत्रातील आग विझवण्यासाठी नागरी संरक्षण पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेतील हल्ल्याचा पंतप्रधान मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.
"संयुक्त अरब अमिरातीवर झालेल्या हल्ल्यांमध्ये तीन भारतीय नागरिक जखमी झाल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. नागरिक आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे अस्वीकार्य आहे. भारत संयुक्त अरब अमिरातीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि संवाद व राजनैतिक मार्गाने सर्व मुद्द्यांच्या शांततापूर्ण निराकरणासाठी आपला पाठिंबा पुनरुच्चारित करतो. शाश्वत प्रादेशिक शांतता, स्थिरता आणि जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित आणि निर्बाध जलवाहतूक सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे," असे रोखठोक मत पंतप्रधान मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले.
Strongly condemn the attacks on the UAE that resulted in injuries to three Indian nationals. Targeting civilians and infrastructure is unacceptable.
— Narendra Modi (@narendramodi) May 5, 2026
India stands in firm solidarity with the UAE and reiterates its support for the peaceful resolution of all issues through…
संयुक्त अरब अमिरातीच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, इराणने चार क्षेपणास्त्रे डागली. यापैकी तीन हवेतच रोखण्यात आली, तर एक समुद्रात कोसळले. स्थानिक प्रशासनाने लोकांना अफवांकडे दुर्लक्ष करून केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. सोमवारी हा हल्ला झाला. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, हा हल्ला ड्रोनच्या साहाय्याने करण्यात आला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, नागरी संरक्षण दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली.