जागा टिकविण्याचे युती-आघाडीपुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 02:05 AM2019-09-22T02:05:33+5:302019-09-22T02:07:16+5:30

नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघातील सध्याचे राजकीय चित्र पाहता युतीच्या खालोखाल कॉँग्रेस आघाडीने गेल्या निवडणुकीत यश मिळविलेले आहे. पण यंदा युती व आघाडीलाही ते टिकवून ठेवणे आव्हानात्मक आहे.

The challenge of securing a coalition-front | जागा टिकविण्याचे युती-आघाडीपुढे आव्हान

जागा टिकविण्याचे युती-आघाडीपुढे आव्हान

Next
ठळक मुद्देजागावाटपावर युतीचे भवितव्य, आघाडीतही फेरबदल शक्य

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघातील सध्याचे राजकीय चित्र पाहता युतीच्या खालोखाल कॉँग्रेस आघाडीने गेल्या निवडणुकीत यश मिळविलेले आहे. पण यंदा युती व आघाडीलाही ते टिकवून ठेवणे आव्हानात्मक आहे. सत्ताधारी भाजप व शिवसेनेत इच्छुकांची असलेली संख्या व उमेदवारीसाठी असलेली रस्सीखेच पाहता, पक्षांतर्ग$त पातळीवर उमेदवारी वाटपावरून राजी-नाराजी निर्माण होवून त्यातून दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर दोन्ही कॉँग्रेस एकत्र लढणार असल्या तरी बोटावर मोजण्याइतके मतदारसंघ वगळता यशाची पूर्ण खात्री देता येत नाही. सर्वांचे लक्ष लागले आहे ते येवला मतदारसंघाकडे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात मतदारसंघात शिवसेनेने चालविलेली तयारी पाहता यंदा भुजबळ मतदारसंघ राखतील काय, हाच खरा प्रश्न आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असली तरी, सत्ताधारी भाजपा, सेनेच्या युतीबाबत अद्याप अनिश्चितता असल्यामुळे दोन्ही पक्षांच्या इच्छुकांमध्ये संभ्रम आहे. युती होणार काय आणि जिल्ह्यातील कोणत्या जागा सुटणार हे जाहीर झालेले नसल्यामुळे दोन्ही पक्षांत जिल्ह्यातील सर्वच जागांवर तयारी केली जात आहे. सध्या भाजप, सेनेच्या ताब्यात प्रत्येकी चार मतदारसंघ असून, राष्टÑवादीच्या चार व कॉँग्रेसच्या ताब्यात दोन मतदारसंघ आहेत. मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाकडे एक जागा आहे. दिंडोरी मतदारसंघात निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार धनराज महाले व रामदास चारोस्कर यांनी सेनेत प्रवेश केला असून, या मतदारसंघातून अनेक इच्छुक असल्यामुळे पक्ष कोणाला उमेदवारी देणार व त्याचे काय पडसाद उमटणार याची उत्सुकता आहे. देवळामधून भाजपला शह देण्यासाठी चांदवडचा एकच उमेदवार देण्याचे घाटत असल्याने तेथे चुरशीची स्पर्धा होईल. नांदगावमध्ये भुजबळपुत्र पंकज यांच्यापुढे यंदा कडवे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत.
मालेगाव मध्य मतदारसंघात एमआयएमने तयारी चालविली असून, तेथे कॉँग्रेसशी लढत होईल. बागलाणमध्ये राष्टÑवादीविरुद्ध भाजपात काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे. नाशिक शहरात तीनही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असल्यामुळे ते टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. पश्चिम मतदारसंघासाठी सेनेने दबाव वाढविला आहे. तर भाजपनेही नांदगावसाठी सेनेवर दबाव ठेवला आहे. मनसेने रिंगणात उतरण्याची घोषणा केल्यामुळे तिरंगी लढतीचे चित्र आहे. वंचित आघाडीकडूनही उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी असल्यामुळे काही मतदारसंघात तिरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढतीची चिन्हे दिसू लागली आहे.
पालकमंत्र्यांचीही
प्रतिष्ठा पणाला
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची व त्यांच्या नेतृत्वाची कसोटी पाहणारी आहे. महाजन यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महापालिका, जिल्हा परिषदेतही भाजप सत्तेत सहभागी होऊ शकली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाजन यांचे नेतृत्व पुन्हा कामी येते काय हे पहावे लागेल.
तुषार शेवाळे यांची कसोटी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉ. तुषार शेवाळे यांची कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आधीच सत्ता हाती नसल्यामुळे कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ व त्यात पक्ष सोडून जाणाऱ्यांची संख्या पाहता, अशा परिस्थितीत कॉँग्रेसला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी शेवाळे यांची कसोटी लागेल.
‘वंचित’चे काय
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने जोरदार हवा निर्माण केली होती. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत वंचितने लाखापेक्षा अधिक मते घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित उमेदवार उभे करणार असली तरी, किती जागा लढविणार याविषयी अनिश्चितता आहे. मतदारसंघ व उमेदवारांचा शोध सुरू आहे.
मनसे फॅक्टर?
निवडणुकीची घोषणा होताच मनसेने जिल्ह्यातील सर्व १५ जागा लढण्याची घोषणा केली आहे. २००९ मध्ये नाशकातील तीन जागा मिळविलेल्या या पक्षात नंतर मोठ्या प्रमाणात गळती झाली. त्यामुळे हा फॅक्टर लक्षवेधी ठरू शकेल.
महाले, चारोस्कर, गावितांचे काय होणार
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सेनेचे माजी आमदार धनराज महाले राष्टÑवादीत गेले व पराभव होताच स्वगृही परतले, तर भाजपाकडे झुकलेले काँग्रेसचे माजी आमदार रामदास चारोस्कर हे शेवटच्या क्षणी शिवबंधनात अडकले. दोन्ही माजी आमदारांची दावेदारी पाहता, दिंडोरीत नेमके काय होईल याविषयी उत्सुकता आहे. तसाच काहीसा प्रकार इगतपुरी मतदारसंघाच्या बाबतीत आहे. दोन वेळा कॉँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या निर्मला गावित यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाला स्थानिक शिवसेनेने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत या तिन्ही आजी-माजी आमदारांची कसोटी लागणार आहे. ते विधीमंडळाची पायरी चढतात की, मतदार वेगळा कौल देतात, हे औत्सुक्याचे ठरले आहे.

Web Title: The challenge of securing a coalition-front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.