मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 19:56 IST2026-05-08T19:51:17+5:302026-05-08T19:56:45+5:30
TVK Thalapathy Vijay Oath Ceremony: सर्व अडथळे दूर झाल्यानंतर आता थलपती विजय तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होणार आहेत.

मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
TVK Thalapathy Vijay Oath Ceremony:थलपती विजय याचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बहुमतासाठी आवश्यक ११८ आमदारांचा पाठिंबा मिळाल्यानंतर आता शनिवार, ०९ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजया टीव्हीके प्रमुख विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय याला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिल्याची माहिती मिळाली आहे.
शनिवारचा दिवस तामिळनाडूसाठी ऐतिहासिक दिवस असेल. शुक्रवारी रात्री राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय याला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले. लोकभवनात झालेल्या बैठकीनंतर शपथविधी सोहळ्याच्या घडामोडींना वेग आला आहे. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
विजयला कोणकोणत्या पक्षांनी दिला पाठिंबा?
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकून टीव्हीके सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. सरकार स्थापन करण्यासाठी ११८ जागांचे बहुमत आवश्यक असते. टीव्हीकेने आता इतर पक्षांचा पाठिंबा मिळवल्यामुळे या आकड्याच्या जवळ पोहोचला आहे. काँग्रेसने आधीच विजय यांना पाठिंबा दर्शवला होता. यानंतर सीपीआय, सीपीआय(एम) आणि व्हीसीके या पक्षाच्या प्रत्येकी दोन आमदारांनी विजय याच्या टीव्हीकेला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे बहुमत गाठणे शक्य झाले.
मुख्यमंत्री म्हणून विजयसमोर असतील मोठी आव्हाने
राजकीय तज्ज्ञांच्या मते, विजय याच्यापुढील सर्वांत मोठे आव्हान आता त्यांनी दिलेली निवडणुकीची आश्वासने प्रत्यक्षात उतरवणे हे असेल. जनतेला रोजगार, सुधारित शिक्षण, सुधारित आरोग्यसेवा आणि वाढीव गुंतवणूक यांसारख्या मोठ्या अपेक्षा आहेत. समर्थकांच्या मते, विजय यांचे सरकार तामिळनाडूमध्ये एक नवीन राजकीय संस्कृती आणि एक नवीन प्रशासकीय प्रारूप आणू शकते.
दरम्यान, विजयच्या राजकारणातील प्रवेशाने चित्रपटसृष्टीच्या पलीकडे एक नवी लाट आणली. टीव्हीके पक्षाने तरुण, महिला आणि सामान्य जनतेमध्ये प्रचंड पाठिंबा मिळवला आहे. अभिनेता ते राजकारणी असा त्याचा प्रवास तामिळनाडूच्या राजकारणात पूर्णपणे परिवर्तन घडवून आणणारा ठरणार आहे. लोक आता विकास, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांसारख्या मुद्द्यांवर नवीन आशा बाळगून आहेत. यामुळेच विजयच्या सभांना प्रचंड गर्दी जमली आणि पहिल्यांदाच निवडणूक लढवत असूनही पक्षाने जबरदस्त कामगिरी केली.