“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 18:14 IST2026-05-08T18:13:48+5:302026-05-08T18:14:43+5:30
Union Home Minister Amit Shah In West Bengal: सुवेंदू अधिकारी यांनी 'दीदींच्या घरात घुसून' त्यांचा पराभव केला, असे सांगत अमित शाह यांनी भवानीपूरसह पश्चिम बंगलाच्या जनतेचे आभार मानले.

“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
Union Home Minister Amit Shah In West Bengal: त्रिपुरा, आसाम आणि पश्चिम बंगालमध्येभाजपाचे सरकार आले आहे. आता सीमा सुरक्षा आणखी मजबूत केली जाईल. तस्करी आणि घुसखोरीवर कठोर कारवाई केली जाईल. घुसखोरांना हाकलून देशाला 'घुसखोरमुक्त' करण्याचे भाजपाचे वचन आहे, असा निर्धार भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगाल येथे विजयी झालेल्या आमदारांच्या एका महत्त्वाच्या बैठकीला अमित शाह यांनी संबोधित केले. या बैठकीत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
नवनिर्वाचित आमदारांना संबोधित करताना अमित शाह यांनी भाजपाच्या ३२१ हुतात्म्यांचे स्मरण केले. हा प्रवास सोपा नव्हता. या विजयासाठी ३२१ भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. संपूर्ण देशातील राजकारण पाहिले आहे. पण पश्चिम बंगाल आणि केरळ येथे झालेला हिंसाचार कधीही पाहिला नाही. कार्यकर्त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे नमूद करत, अमित शाह यांनी सर्वांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच बलिदान दिलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना नमन केले.
श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जन्मभूमीत भाजपाचा विजय ऐतिहासिक क्षण
सुवेंदू अधिकारी यांनी 'दीदींच्या घरात घुसून' त्यांचा पराभव केला आहे. भवानीपूरच्या नागरिकांनी एक स्पष्ट संदेश दिला आहे, असे म्हणत अमित शाह यांनी जनतेचे आभार मानले. तसेच पश्चिम बंगालमधील विजय वैचारिकदृष्ट्याही महत्त्वपूर्ण आहे. १९५० मध्ये सुरू झालेला वैचारिक प्रवास आज बंगालमध्ये पोहोचला आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची जन्मभूमि असलेल्या बंगालमध्ये त्यांच्या वैचारिक पक्षाचे सरकार स्थापन होणे हा एक ऐतिहासिक क्षण आहे. जेव्हा अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आले, तेव्हा अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी म्हटले होते की, अजूनही एका गोष्टीची उणीव आहे, ती म्हणजे बंगालमधील भाजपा सरकार. आज ते स्वप्नही साकार होताना दिसत आहे, असे अमित शाह म्हणाले.
पश्चिम बंगालचा विजय हा राष्ट्रीय सुरक्षा आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रतिक
पश्चिम बंगालमधील महिला उमेदवारांचा उल्लेख करत अमित शाह म्हणाले की, पक्षाने असे चेहरे पुढे आणले जे शोषण आणि संघर्षाचे प्रतीक बनले. २०१४ मध्ये सुरू झालेला भाजपाचा प्रवास आता गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत पोहोचला आहे. भाजपाने केवळ आपल्या संघटनेचा विस्तारच केला नाही, तर आपली विचारधाराही अधिक मजबूत केली. प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने विकास आणि जनसमर्थन दोन्ही मजबूत केले असून, हीच पक्षाची सर्वांत मोठी ताकद आहे. पश्चिम बंगालमधील विजय केवळ भाजपाच्या विस्तारापुरता मर्यादित नाही, तर राष्ट्रीय सुरक्षा आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाशीही संबंधित आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपा प्रयत्न करेल
ज्या परिस्थितीत निवडणुका झाल्या, ते पाहता जनतेने भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवत प्रचंड जनादेश दिला. कम्युनिस्ट राजवटीपासून बंगालमध्ये भीती आणि हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले, ते अधिकच वाढत गेले. अशा परिस्थितीत आपले मत व्यक्त करणे जवळजवळ अशक्य झाले होते, तरीही जनतेने भाजपाला पाठिंबा दिला. भाजपा जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल आणि 'सोनार बांगला'च्या ध्येयाने पुढे वाटचाल करेल, असा शब्द अमित शाह यांनी यावेळी दिला.
दरम्यान, आता बंगालमध्ये भीतीमुक्त समाजाच्या दिशेने मार्ग मोकळा झाला असून जनतेने बदलाचा स्पष्ट संकेत दिला आहे. गेल्या पाच दशकांत बंगालने कायदा व सुव्यवस्था, लोकशाही आणि अर्थव्यवस्था या बाबतीत नकारात्मक राजकारणाचा काळ अनुभवला आहे. पंतप्रधान मोदींनी बंगालच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी आता भाजपाची आहे. बंगालची संस्कृती आणि परंपरा पुनरुज्जीवित करण्याचे काम भाजपा करेल आणि रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, अरविंद आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या संकल्पनेतील बंगाल घडवण्याच्या दिशेने वाटचाल करेल, असे आश्वासन अमित शाह यांनी दिले.