बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 18:51 IST2026-05-08T18:47:38+5:302026-05-08T18:51:03+5:30
Rajasthan News: मृत्यू झाला असे समजून नातेवाईकांनी अंत्यविधीची तयारी केली. गावकरी शेवटचे दर्शन घेत असतानाच सदर महिला अचानक उठून बसली आणि सर्वांनाच धक्का बसला.

बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
Rajasthan News: राजस्थानमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेला रात्री डॉक्टरांनी मृत घोषित केले. यानंतर कुटुबीयांनी नातेवाईकांना निरोप पाठवले. गावकरीही जमले. अंत्यसंस्काराची तयारीही करण्यात आली. परंतु, सकाळी अचानक तीच महिला उठून बसली. या अजब प्रकाराची चर्चा देशभर सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.
राजस्थानमधील अलवर सीमेवरील अजबगड येथील एका गावात घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसराला धक्का बसला आहे. डॉक्टरांनी चमेली देवी नावाच्या ६५ वर्षीय महिलेला मृत घोषित केले होते. त्यामुळे कुटुंबीय आणि गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली. नातेवाईकांना निरोप पाठवण्यात आले. मात्र, अंत्यसंस्काराच्या अगदी आधी महिलेने हालचाल केली. या दृश्यामुळे कुटुंबात घबराट पसरली. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. लगेचच त्या महिलेला पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले.
तिचा मृत्यू झाला आहे असे सर्वांना वाटले
महिलेचा मुलगा बाबूलाल मीणा याने सांगितले की, मंगळवारी रात्री त्याच्या आईची प्रकृती अचानक खालावली. थोड्या वेळाने, तिचे शरीर निश्चल झाले आणि तिचा श्वास इतका मंदावला की, तिचा मृत्यू झाला आहे असे सर्वांना वाटले. तिला पलंगावरून खाली उतरवून जमिनीवर झोपवण्यात आले, नातेवाईकांना कळवण्यात आले. रात्रभर गावात शोकाचे वातावरण पसरले होते. सकाळी, अंत्ययात्रेची तयारी सुरू असताना आणि लोक अंतिम दर्शनासाठी येऊ लागले. अशातच त्या महिलेच्या पायांमध्ये थोडी हालचाल जाणवली. सुरुवातीला कोणाचाही विश्वास बसला नाही, पण जेव्हा तिचे शरीर पुन्हा हलू लागले, तेव्हा तिचे कुटुंबीय थक्क झाले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पडताळणीशिवाय एखाद्याला मृत घोषित करणे धोकादायक
कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, चमेली देवी यांना आधीपासूनच श्वसनाचा त्रास होता. त्यांना २ एप्रिल २०२६ रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि ३ मे रोजी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर, ४ मे च्या रात्री त्यांची प्रकृती अचानक खालावली. हा एक चमत्कारच आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, अनेक गंभीर आजारांमध्ये शरीराची कार्यप्रणाली मोठ्या प्रमाणात मंदावते, त्यामुळे वैद्यकीय पडताळणीशिवाय एखाद्याला मृत घोषित करणे धोकादायक ठरू शकते.
दरम्यान, दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिची तपासणी करून तिला आयसीयूमध्ये दाखल करत उपचार सुरू केले. आता त्या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. डॉ. आर. के. मीणा यांनी सांगितले की, महिलेचा श्वासोच्छ्वास लक्षणीयरीत्या मंदावल्याने तिला मृत समजण्यात आले होते. रुग्णालयाने सीटी स्कॅनसह अनेक चाचण्या केल्या. सीटी स्कॅनचे निकाल सामान्य होते, परंतु रक्ताचा संसर्ग आढळून आला. आता ती महिला चांगली हिंडू-फिरू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.