“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 19:24 IST2026-05-08T19:20:59+5:302026-05-08T19:24:31+5:30
Nashik TCS Case Nida Khan AIMIM: नाशिक TCS प्रकरणात निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथून अटक होताच उद्धवसेनेच्या नेत्यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली.

“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
Nashik TCS Case Nida Khan AIMIM: नाशिकच्या टीसीएस कंपनीतील अत्याचार व कथित सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात (कार्पोरेट लव्ह जिहाद) छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई केली. या प्रकरणातील फरार महिला आरोपीला शहरातील नारेगावातून अटक करण्यात आली. यानंतर निदा खानला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तिला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी AIMIM पक्षाचे नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेचे नेते आक्रमक झाले असून, एआयएमआयएम पक्षावरच बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.
नाशिक शहरातील चर्चेत असणारे TCS धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरणी मुख्य महिला आरोपी निदा खान हिला पोलिसांनी २५ दिवसांनंतर अटक केली. निदा खान पोलिसांना गुंगारा देत छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरात लपून बसली होती. निदा खान हिला लपण्यासाठी मदत करत असल्याच्या आरोपाखाली छत्रपती संभाजीनगरचे AIMIM पक्षाचे नगरसेवक मतिन पटेल याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले. आता उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली.
AIMIM पक्षावरच बंदी घाला
ज्या ठिकाणावरून निदा खानला पोलिसांनी ताब्यात घेतले, त्या परिसरात अनेक अवैध धंदे सुरू आहेत. भागातील एमआयएमच्या मतीन नावाच्या नगरसेवकालाही अटक करावी. छत्रपती संभाजीनगर नावाचा इम्तियाज जलील यांना पहिल्यापासूनच राग आहे. त्या मुलीला लपवण्यामागे मतीन पटेल आणि त्यांचे बॉस इम्तियाज जलील यांचा हात आहे, असा गंभीर आरोप करत, एमआयएमवर बंदी घालण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, निदा खान ही केवळ एक मोहरा असून याचे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. धर्मांतर करणे आणि मुलींना फसवणे हे प्रकार एमआयएमच्या नेतृत्वात होतात. निदा खान इतर कुठेही न जाता केवळ छत्रपती संभाजीनगरलाच का आली? कारण याचे मास्टरमाइंड इथेच आहेत. नारेगावसारख्या संवेदनशील भागात तिला आश्रय दिला गेला, जिथे अमली पदार्थांचे धंदे चालतात. इम्तियाज जलील यांनी निदा खानसाठी पत्रकार परिषद घेऊन तिला उघड पाठिंबा दिला होता. कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी जलील यांची चौकशी झाली पाहिजे. मी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन एसआयटी चौकशीची मागणी करणार आहे, असे शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी सांगितले.