कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 19:42 IST2026-05-08T19:42:11+5:302026-05-08T19:42:44+5:30
शुभेंदू अधिकारी यांचे वडील शिशिर अधिकारी हे देखील राजकारणातील एक मोठे नाव असून ते केंद्रात मंत्रीही राहिले आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शुभेंदु यांनी तरुण वयातच राजकारणात प्रवेश केला.

कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
तृणमूल काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे आणि ममता बॅनर्जी यांना पराभवाचा धक्का देणारे भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांचे नाव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित करण्यात आले आहे. कधीकाळी ममता बॅनर्जी यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे अधिकारी, हे आज भाजपचे बंगालमधील सर्वात मोठे नेते म्हणून उदयास आले आहेत. त्यांच्या राजकीय जीनवातील सर्वात मोठी घटना म्हणजे, त्यांनी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा केलेला पराभव.
शुभेंदू अधिकारी यांचे शिक्षण -
१५ डिसेंबर १९७० रोजी जन्मलेले शुभेंदू अधिकारी किती शिकलेले आहेत? हे जाणून घेण्याची जनतेला मोठी उत्सुकता आहे. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांनी पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांनी रवींद्र भारती विद्यापीठातून २०११ मध्ये एम.ए. ची पदवी मिळवली. हे विद्यापीठ पश्चिम बंगालमधील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांमध्ये गणले जाते. विशेषतः कला, संस्कृती आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी हे विद्यापीठ ओळखले जाते. आपल्या सक्रिय राजकीय कारकिर्दीतही त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले.
त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे देखील राजकारणातील एक मोठे नाव असून ते केंद्रात मंत्रीही राहिले आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शुभेंदु यांनी तरुण वयातच राजकारणात प्रवेश केला.
अशी आहे शुभेंदू अधिकारी यांची राजकीय कारकीर्द -
त्यांची राजकीय कारकीर्द तृणमूल काँग्रेसमधून सुरू झाली. २००६ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले आणि २००९ व २०१४ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. नंदीग्राममधील भूमी अधिग्रहण विरोधी आंदोलनाने ते राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. या आंदोलनातील त्यांच्या भूमिकेमुळे तृणमूलला बंगालमध्ये सत्ता मिळाली. मात्र, २०२० मध्ये त्यांनी तृणमूल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी पक्षाला बंगालमध्ये एक मजबूत स्थान मिळवून दिले. नंदीग्राममधील त्यांच्या ऐतिहासिक विजयाने त्यांची 'जायंट किलर' म्हणून ओळख निर्माण झाली. ते सध्या विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी सांभाळत होते.