Cold Vs Normal Water : उन्हाचा पारा वाढला की, शरीराला अधिक पाण्याची गरज भासते. कारण सतत वाहणाऱ्या घामातून शरीरातील पाणी तर कमी होतंच, सोबतच अनेक पोषक तत्वही बाहेर पडतात. ज्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि आरोग्यासंबंधी इतर समस्याही डोकं वर वाढतात. हेच कारण आहे की, डॉक्टर या दिवसांमध्ये इतर दिवसांच्या तुलनेत अधिक पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण उकाडा वाढला की, अनेकांना नॉर्मल पाणी पिणं शक्य होतं नाही. एक घोटही घशाखाली जात नाही किंवा प्यायलं तरी तहान भागत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोक उन्हाळ्यात फ्रिजचं थंड पाणी पितात. मग जे हेल्थ कॉन्शिअस लोक आहेत त्यांना प्रश्न पडतो की, या दिवसांमध्ये फ्रिजमधील बर्फासारखे थंड पाणी प्यावे की साधे नॉर्मल पाणी? खरं तर याचे उत्तर आपल्या शरीराची गरज आणि त्या वेळची परिस्थिती यावर अवलंबून असते.
थंड पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे
कडक उन्हातून घरी आल्यानंतर किंवा खूप घाम आल्यानंतर थंड पाणी प्यायल्यावर लगेच आराम आणि गारवा जाणवतो. शरीराचं वाढलेलं तापमान पटकन कमी होत. ताजंतवानं आणि फ्रेश वाटतं आणि उष्णतेमुळे आलेला थकवा कमी होण्यास मदत होते. पण वैज्ञानिकांच्या मते, अतिशय थंड पाणी प्यायल्याने शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावू शकतात. याचा परिणाम पचन प्रक्रियेवर होऊ शकतो. तसेच अचानक खूप थंड पाणी प्यायल्याने घसा खवखवणे, सर्दी-खोकला, पोटात गोळे येणे, अॅसिडिटी, अपचन अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
नॉर्मल पाणी का चांगले मानले जाते?
खोलीच्या तापमानाचे पाणी शरीरासाठी अधिक नैसर्गिक आणि सुरक्षित मानले जाते. कारण नॉर्मल पाणी शरीराच्या नैसर्गिक तापमानाच्या जवळ असल्यामुळे शरीर ते सहज शोषून घेते. त्यामुळे पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण येत नाही. जेवताना किंवा जेवल्यानंतर लगेच नॉर्मल पाणी पिणं अधिक योग्य मानलं जातं. कारण खूप थंड पाणी पचन प्रक्रिया मंदावू शकतं.
डॉक्टर काय सांगतात?
दिल्लीतील PSRI Hospital येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट Dr. Nripen Saikia यांच्या माहितीनुसार, दोन्ही प्रकारच्या पाण्याचे शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात. थंड पाणी लगेच आराम देते, पण दीर्घकाळासाठी आणि पचन चांगले ठेवण्यासाठी नॉर्मल पाणी अधिक संतुलित आणि सुरक्षित पर्याय मानला जातो.
मग कोणते पाणी प्यावे?
उन्हातून आल्यावर किंवा जास्त घाम आल्यानंतर थंड पाणी थोड्या प्रमाणात चालू शकतं. मात्र रोजच्या वापरासाठी आणि खासकरून जेवताना नॉर्मल पाणी अधिक चांगलं असतं. म्हणून पुढच्या वेळी पाणी पिताना आपल्या शरीराची गरज आणि आरोग्य लक्षात घेऊनच योग्य पर्याय निवडा.