उखडलेले डांबरीकरण, खचलेले रस्ते; पालखी महामार्ग पाहणी दरम्यान गडकरींनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 16:35 IST2026-05-16T16:35:40+5:302026-05-16T16:35:50+5:30
निकृष्ट दर्जाचे काम आणि अपूर्ण कामे आढळल्याने गडकरींनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत ठेकेदारांचे बिल देण्याचे थांबवा, असा आदेशच दिला

उखडलेले डांबरीकरण, खचलेले रस्ते; पालखी महामार्ग पाहणी दरम्यान गडकरींनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी
पुणे : संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग धार्मिक आणि भावनिक आहे. देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय महामार्ग हा पाटस ते पंढरपूर असा १३० कि.मी. लांबीचा महामार्ग पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडतो. याचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याने इतर उर्वरित कामे लवकरच करण्यात येतील, अशा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. निकृष्ट कामाचा दर्जा पाहून ठेकेदाराचे पैसे रोखा, असा आदेशही त्यांनी दिला.
संत ज्ञानेश्वर महाराज महामार्गाची गुरुवारी पाहणी केल्यानंतर गडकरी यांनी दुसऱ्या दिवशी संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील इंदापूर ते वसुंदे या दरम्यान बसने पाहणी केली. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. या वेळी दौऱ्यात राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कूल यांच्यासह प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर उपस्थित होते.
पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर आणि इंदापूर ते तोंडले अशा ३ पॅकेजमध्ये या मार्गाचे काम करण्यात येत आहे. यापैकी पाटस ते बारामती हा भाग पूर्ण झाला असून, इंदापूर ते तोंडले भागाचे काम ९६ टक्के आणि बारामती ते इंदापूर भागाचे काम ८४ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतिपथावर असून लवकरच ते पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली.
संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाची बसमधून बारकाईने पाहणी केली. यावेळी अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम, उखडलेले डांबरीकरण, खचलेले रस्ते आणि अपूर्ण कामे आढळल्याने त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत ठेकेदारांचे बिल देण्याचे थांबवा, असा आदेशच दिला.
पालखी मार्गावर ४० हजार वृक्षलागवड
पुणे ते फलटण व पुणे बारामती पालखी मार्गावरील राष्ट्रीय मार्गावरील रस्त्याचे दुतर्फा देशी प्रजातीचे ४० हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहे. यामध्ये कडुलिंब, वड, पिंपळ, शिसम, जांभूळ, बांबू या वृक्षांचा समावेश आहे. ज्यामुळे वारकऱ्यांसाठी सावलीची व्यवस्था तसेच पर्यावरण संवर्धन साधले जाईल, असे गडकरी म्हणाले. तसेच ४५० झाडांचे पुनर्रोपण केले आहे.