“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 18:05 IST2026-05-16T18:05:23+5:302026-05-16T18:05:32+5:30
Supreme Court CJI Suryakant: देशातील युवावर्ग विकसित भारताची सर्वांत मोठी ताकद आहेत, असे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटले आहे.

“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
Supreme Court CJI Suryakant: मीडियाच्या एका गटाने माझ्या तोंडी विधानाचा विपर्यास केला, याचा मला खेद आहे. विशेषतः अशा लोकांवर टीका केली होती, जे बनावट पदव्यांच्या आधारे वकिली व्यवसायात दाखल झाले आहेत. अशा व्यक्तींनी परजीवींप्रमाणे वावरत, प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया आणि इतर प्रतिष्ठित व्यवसायांमध्येही शिरकाव केला आहे. देशातील तरुणांवर टीका केली, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. देशातील तरुणांचा मला अभिमान आहे. विकसित भारताची सर्वांत मोठी ताकद आहेत, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी दिले.
काही बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी करत, हे तरुण पुढे जाऊन मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ला करण्यास सुरुवात करतात, असे विधान भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीवेळी केले होते. यानंतर या विधानावरून उलट-सुलट चर्चा झाल्या आणि सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटले. यावरून आता न्या. सूर्यकांत यांनी खुलासा केला.
मला भारतीय तरुणांबद्दल आदर आहे
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत पुढे म्हणाले की, मला केवळ देशाच्या सध्याच्या आणि भविष्यातील मानवी संसाधनांच्या क्षमतेचाच अभिमान नाही, तर भारतातील प्रत्येक तरुण मला प्रेरणा देतो. मला भारतीय तरुणांबद्दल आदर आहे आणि मी त्यांना विकसित भारताचे आधारस्तंभ मानतो, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, एका वकिलाने सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्या. बागची यांच्या खंडपीठासमोर दिल्ली उच्च न्यायालयाकडून ज्येष्ठ वकील दर्जा मिळवण्यासाठी याचिका दाखल केली. त्या वकिलाच्या व्यावसायिक वर्तनावर आणि त्याने सोशल मीडियावर वापरलेल्या भाषेवर खंडपीठ नाराज झाले. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना हा दर्जा दिला असला तरी, सर्वोच्च न्यायालय तो रद्द करेल. हा दर्जा म्हणजे केवळ शोभेसाठी असलेले पदक आहे का आणि अशा व्यक्तीला ज्येष्ठ वकील म्हणून संबोधले जावे का, भारतातील वकिली व्यवसायात 'वरिष्ठ वकील' नावाचा एक विशेष दर्जा आहे. जेव्हा न्यायालयाला असे वाटते की, वकिलाचा अनुभव, कार्य आणि व्यावसायिक आचरण यास पात्र आहेत, तेव्हा न्यायालय स्वतः हा दर्जा प्रदान करते. हा दर्जा मागितला जात नाही, तर तो दिला जातो. कोणताही वकील स्वतःहून यासाठी याचिका दाखल करत नाही, या शब्दांत न्यायालयाने फटकारले.