Mohsin Naqvi Possible India Visit During IPL 2026 Final : आयपीएल २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्याआधी क्रिकेट विश्वात एका नव्या चर्चेला उधाण आलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार का? हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंध आधीच तणावपूर्ण असताना अहमदाबादमध्ये होणाऱ्या ICC च्या महत्त्वाच्या बैठकीमुळे नवा मुद्दा चर्चेत आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अहमदाबादमध्ये आयोजित आहे ICC ची बैठक
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मुख्य कार्यकारी समितीची बैठक २१ मे रोजी ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. त्यानंतर ३० आणि ३१ मे रोजी अहमदाबादमध्ये प्रत्यक्ष बोर्ड बैठकींचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे याच काळात IPL 2026 चा अंतिम सामना देखील अहमदाबादमध्ये होणार आहे. यापूर्वी या बैठका कतारची राजधानी दोहा येथे मार्च-एप्रिलमध्ये नियोजित होत्या. पण पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे ICC ने त्या भारतात पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
मोहसिन नक्वी भारतात येणार का? चर्चेला उधाण
PCB अध्यक्ष म्हणून मोहसिन नक्वी यांनी ICC बैठकीला उपस्थित राहणं ही सामान्य बाब मानली जात असली, तरी सध्याच्या भारत-पाक संबंधांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संभाव्य भारत दौऱ्याकडे विशेष लक्ष लागलं आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, IPL 2026 फायनलसाठी नक्वींना अधिकृत निमंत्रण देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या दाव्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. भारताकडूनही यासंदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मोहसिन नक्वी हे फक्त PCB चेअरमन नाहीत, तर पाकिस्तान सरकारमधील मंत्री आणि आशियाई क्रिकेट परिषद (ACC) चे अध्यक्ष देखील आहेत. त्यामुळे त्यांच्या संभाव्य भारत दौऱ्याकडे केवळ क्रिकेटपुरतं पाहिलं जात नाही.
आशिया कप स्पर्धेतील ट्रॉफीचा वाद
भारत-पाक यांच्यातील राजकीय तणावपूर्ण परिस्थितीचा दोन्ही देशांतील क्रिकेट संबंधावर परिणाम झाला आहे. त्यात आशिया कप स्पर्धेतील जेतेपदानंतर ट्रॉफी वादामुळे दोन्ही क्रिकेट बोर्डांतील संबंध आणखी बिघडल्याचं पाहायला मिळालं. भारतीय संघाने फायनलमध्ये पाकिस्तानला पराभूत करत स्पर्धा जिंकली. मात्र भारतीय संघाने मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याची चर्चा रंगली होती. नक्वी यांनी भारतीय संघाने जिंकलेली ट्रॉफी आणि पदकांसह स्टेडियममधून काढता पाया घेतला. ही ट्रॉफी दुबईत सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिल्याचंही समोर आले होते. BCCI ने ट्रॉफी परत देण्याची मागणी केली आणि हे प्रकरण ICC पर्यंत पोहोचले होते. त्यामुळे ICC साठी अहमदाबादमधील बैठक ही नियमित प्रशासकीय प्रक्रिया असली, तरी भारत-पाक क्रिकेटच्या दृष्टीने हा मुद्दा संवेदनशील बनला आहे. आता मोहसिन नक्वी स्वतः भारतात येतात की, पाकिस्तान दुसरा प्रतिनिधी पाठवतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.