Pakistan vs Bangladesh Test: पाकिस्तानलाबांगलादेशने पहिल्या कसोटी सामन्यात १०४ धावांनी पराभूत केले. पहिल्या डावात बांगलादेशने ४१३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानला केवळ ३८६ धावाच करता आल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात बांगलादेशने २४० धावांवर डाव घोषित केला होता. त्यामुळे पाकिस्तानसमोर २६८ धावांचे लक्ष्य होते. पण पाकिस्तानचा दुसरा डाव अवघ्या १६३ धावांवर संपुष्टात आला. या पराभवासोबतच पाकिस्तानला ICCकडूनही मोठा दणका बसला.
पाकिस्तानला मोठा धक्का
पाकिस्तानच्या संघाने मैदानावर तर सामना हरलाच, पण त्यासोबतच अशी चुकही केली ज्यामुळे पाकिस्तानला आयसीसीकडून मोठा दणका मिळाला. कसोटी सामन्यात षटकांचा वेग कमी राखल्यामुळे आयसीसीने पाकिस्तानचे डब्ल्यूटीसीमधील गुण कमी केले आहेत. बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानने लक्ष्यापेक्षा आठ षटके धीम्या गतीने टाकल्यामुळे त्यांचे आठ डब्ल्यूटीसी गुण कमी करण्यात आले. इतकेच नाही, तर षटकांचा वेग कमी असल्यामुळे पाकिस्तानी संघाच्या सामना शुल्कापैकी ४० टक्के रक्कमही कापण्यात आली.
आयसीसीचा नियम काय?
कसोटीत संथ गतीने षटके टाकण्याबाबतचे आयसीसीचे नियम खूप कडक आहेत. आयसीसीच्या नियमांनुसार, प्रत्येक संघाने एका तासात १५ षटके टाकली पाहिजेत. याची गणना सामना संपल्यानंतर केली जाते. उशीर झालेल्या प्रत्येक षटकासाठी एक गुण वजा केला जातो. पाकिस्तानने ८ षटके संथ गतीने टाकल्याबद्दल त्यांचे ८ गुण कमी करण्यात आले. आयसीसीच्या या कारवाईनंतर, पाकिस्तानचे डब्ल्यूटीसी गुण आता केवळ ४ वर आले असून, ते ७ व्या स्थानावर आहेत.
बांगलादेशकडून दारुण पराभव
या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नाझमुल होसेन शांतो आणि वेगवान गोलंदाज नाहिद राणा यांनी पाकिस्तानची धुलाई केली. शांतोने पहिल्या डावात १०१ धावा आणि दुसऱ्या डावात ८७ धावांची खेळी केली. दरम्यान, नाहिद राणाने भेदक गोलंदाजी करत पाच बळी घेतले. त्याने आपल्या वेगाने पाकिस्तानच्या अर्ध्या संघाला बाद केले. परिणामी, दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तान ०-१ ने मागे पडला. मालिकेतील अंतिम कसोटी सामना आता १६ मे रोजी सिल्हेट येथे खेळला जाईल.