कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 19:17 IST2026-05-15T19:12:54+5:302026-05-15T19:17:27+5:30
Farmers Protest in Mumbai: यावर्षी कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
Farmers Protest in Mumbai: गेल्या काही वर्षांपासून राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. याचा विपरित परिणाम शेतीवर आणि शेतकऱ्यांवरही होताना दिसत आहे. यासंबंधी कोकणातील शेतकरी सरकारकडे सातत्याने मदतीचे आवाहन करत आहेत. परंतु, शेतकऱ्यांच्या मागणीला सरकारकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगत आज काही शेतकऱ्यांनी आणि आंदोलकांनी मंत्रालयावर धडक मोर्चा नेला आणि आपल्या मागण्या मांडल्या. आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली. यात शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेकापचे जयंत पाटील, शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत आणि इतर नेतेमंडळीही होते. त्यामुळे आंदोलक शेतकरीही आक्रमक झाल्याचे दिसून आले.
या वर्षी कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यावर सरकारने त्यांना २२ हजारांची मदत जाहीर केली. पण ही मदत तुटपुंजी असल्याचे सांगत काजू आणि आंबा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी मुंबई गाठली. गिरगाव चौपाटीपासून मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्याकडे हा मोर्चा काढण्यात येणार होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन काजू आणि आंबा उत्पादकांच्या विविध मागण्या मांडण्याचा आंदोलकांचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी त्या आधीच आंदोलकांची धरपकड केली.
अवकाळी पावसामुळे कोकणातील काजू आणि आंबा उत्पादक शेतकरी कोलमडून गेला. कोकणातील शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. परंतु सरकारकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पर्याय स्वीकारला. आंदोलकांनी आझाद मैदानावर आंदोलन करावे असे पोलिसांनी सांगितले होते. मात्र आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यावर ठाम होते. त्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाला आणि त्यामुळे आंदोलकांची धरपकड करण्यात आली.