‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून राज्यभर गदारोळ; सध्या बाजारात प्रचंड मागणी, जोरदार विक्री सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 18:27 IST2026-04-27T18:27:16+5:302026-04-27T18:27:54+5:30
वादामुळे तरी लोकं पुस्तक वाचायला सुरुवात करत आहेत, ही वाचनसंस्कृतीच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे.

‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून राज्यभर गदारोळ; सध्या बाजारात प्रचंड मागणी, जोरदार विक्री सुरु
पुणे : सध्या ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकावरून राज्यभरात गदारोळ सुरू आहे. आमदार संजय गायकवाड यांनी या नावावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केली. त्यानंतर या पुस्तकाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. परिणामी सोशल मीडियावर त्याचे ‘पीडीएफ’ वेगाने वाचले जात आहे. तर पुस्तकाच्या दुकानातूनही त्याची विक्री जोरदार होत आहे. वादामुळे तरी लोकं पुस्तक वाचायला सुरुवात करत आहेत, ही वाचनसंस्कृतीच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे.
एखाद्या पुस्तकावरून वाद झाला की, त्याची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. परंतु, सध्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून बराच वादंग सुरू असल्याने त्या पुस्तकाची मागणीही वाढली आहे. ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता?’ ही पुस्तिका लिहिली आहे. त्याची सव्वाशेहून अधिक आवृत्त्या आल्या. खरं तर हे पुस्तक नव्हेच ती एक छोटेखानी, अवघ्या ७४ पानांची पुस्तिका आहे. पण त्या पुस्तकातून पानसरे यांनी छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्त्व उभं केलं आहे. पानसरे यांनी सर्व समज-गैरसमजांना सज्जड पुराव्यानिशी छेद देत, त्यातून हा `जाणता राजा' कसा सर्व समाजाचा आणि विशेषत: `आम आदमी'चा राजा होता, ते दाखवून दिलं आहे. दरम्यान, बुकगंगावर देखील पुस्तक उपलब्ध आहे. त्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर लोक कमेंट करत आहेत. इतर अनेक ऑनलाइन संकेतस्थळावरूनही या पुस्तकाची विक्री होत आहे.
लाखो प्रतींची विक्री
पहिली आवृत्ती १९८८ मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर १२५ हून अधिक आवृत्त्या आल्या आहेत. सुरुवातीला एका महिन्यात ३ हजार प्रती संपल्या होत्या. त्यानंतर सातत्याने ३ हजार किंवा ५ हजारांची आवृत्ती प्रकाशित झाली आणि त्या हातोहात खपल्या. सुरुवातीला पुस्तिकेची किंमत ५ रुपये होती. त्यानंतर हळूहळू वाढविण्यात आली. आता देखील नवीन आवृत्तीसाठी प्रकाशकांनी ऑर्डर दिली आहे.
‘पीडीएफ’ प्रचंड शेअर
सोशल मीडियावर तर विविध शिवप्रेमी ग्रुपवरून पुस्तकाच्या पीडीएफ शेअर केल्या जात आहेत. ज्यांना पीडीएफ हवे त्यांनी मोबाईल नंबर पाठवावा, असे आवाहनही केले जात आहे. या पुस्तकामुळे अनेक ग्रुपवर पीडीएफ टाकता येत नाही. परिणामी वाचकांनी कोणाला मोबाईल नंबर टाका आणि पीडीएफ घ्या, असा मार्ग शोधला आहे.