राज्यात तीन वर्षांत हत्ती रोगाचे १,२०५ नवीन रुग्ण; पुणे जिल्ह्यात ४४ रुग्णांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 17:49 IST2026-05-08T17:49:19+5:302026-05-08T17:49:30+5:30
राज्यभरात ६५ सर्वेक्षण, १७ नियंत्रण पथके, तर ३४ रात्रीची दवाखाने कार्यरत

राज्यात तीन वर्षांत हत्ती रोगाचे १,२०५ नवीन रुग्ण; पुणे जिल्ह्यात ४४ रुग्णांची नोंद
पुणे : महाराष्ट्रात हत्तीरोग अर्थात फिलेरिया नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून व्यापक उपाययोजना राबविण्यात येत असून, गेल्या तीन वर्षांत राज्यात १ हजार २०५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यात ४४ रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यभर ६५ सर्वेक्षण पथके, १७ नियंत्रण पथके आणि ३४ रात्रीचे दवाखाने कार्यरत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
फिलेरिया हा डासांमार्फत पसरणारा संसर्गजन्य आजार असून त्यातून हात-पाय सुजणे, हायड्रोसील आणि कायमस्वरूपी अपंगत्वाची शक्यता निर्माण होते. राज्यातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली, नांदेड, ठाणे, सोलापूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हा आजार स्थानिक स्वरूपात अधिक प्रमाणात आढळतो.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये ३७५, २०२४ मध्ये ३२४, तर २०२५ मध्ये ४५९ नवीन रुग्ण आढळले. २०२६ मध्ये एप्रिलअखेरपर्यंत आणखी ४७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच या कालावधीत हायड्रोसीलच्या ४ हजार ७५३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, अकोला, अमरावती, जळगाव, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि वर्धा हे जिल्हे टास-३ टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण करून फिलेरिया नियंत्रणाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. तर चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार, पालघर, ठाणे व भंडारा येथे औषध वितरण मोहीम सुरू आहे. रुग्णांसाठी मोर्बिडिटी मॅनेजमेंट अँड डिसॅबिलिटी प्रिव्हेन्शन किटचे वाटपही सुरू आहे. यात औषधी साबण, कापडी नॅपकिन, कापूस, पोविडोन आयोडीन, मलम आदी साहित्य दिले जात आहे.
जिल्ह्यात आढळलेले बहुतांश रुग्ण इतर जिल्ह्यांतून आलेले :
पुणे जिल्ह्यात आढळलेल्या ४४ रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील १९, पुणे महापालिका क्षेत्रातील १७ आणि पिंपरी-चिंचवडमधील ८ रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ३१ रुग्ण तिसऱ्या किंवा त्यापुढील गंभीर टप्प्यातील असून, २८ जणांना अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात आले आहे. बहुतांश रुग्ण हे इतर जिल्ह्यांतून रोजगारासाठी आलेले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
६ हजार १६६ नागरिकांना दिव्यांग प्रमाणपत्रे :
राज्यात मोठ्या प्रमाणावर औषध वितरण मोहिमेद्वारे ३२ लाखांहून अधिक पात्र नागरिकांना प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच, हत्तीरोगामुळे दिव्यांगत्व आलेल्या रुग्णांसाठी विशेष मोहीम राबवून फेब्रुवारी २०२६ अखेर ६ हजार १६६ नागरिकांना दिव्यांग प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.