हिंजवडी आयटी पार्कमध्ये नवा वाद..! ‘त्या‘ कंपनीच्या विश्रांती कक्षाची चौकशी करा; मिसाळ यांचे पुणे पोलिस आयुक्तांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 13:05 IST2026-04-21T13:01:38+5:302026-04-21T13:05:24+5:30
Hinjawadi IT companies controversy - हिंजवडीत विश्रांती कक्षाच्या वापरावरून वाद; चौकशीचे आदेश

हिंजवडी आयटी पार्कमध्ये नवा वाद..! ‘त्या‘ कंपनीच्या विश्रांती कक्षाची चौकशी करा; मिसाळ यांचे पुणे पोलिस आयुक्तांना पत्र
पुणे - नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुण्यातील आयटी हब हिंजवडी परिसरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विश्रांती कक्ष वापराबाबत गंभीर तक्रारींची दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
मिसाळ यांना विविध स्रोतांतून मिळालेल्या माहितीनुसार, एका नामांकित मल्टिनॅशनल कंपनीतील पुरुष विश्रांती कक्षाचा काही विशिष्ट गटाकडून धार्मिक विधीसाठी नियमित वापर होत असल्याची तक्रार आहे. या काळात इतर कर्मचाऱ्यांना प्रवेश मर्यादित केल्याचेही सांगितले जात आहे. ही बाब खरी असल्यास, कार्यस्थळी उपलब्ध सुविधांचा समसमान वापर, कर्मचारी हक्क आणि संस्थात्मक शिस्त यावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
माधुरी मिसाळ यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात काही महत्त्वाच्या बाबींवर भर दिला आहे या पात्रात तक्रारींची वस्तुनिष्ठ पडताळणी करणे, संबंधित कंपन्यांमध्ये आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना करणे, महिला कर्मचाऱ्यांशी गोपनीय संवाद साधून कोणताही दबाव किंवा छळ होत आहे का ? याची चौकशी करणे अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात मिसाळ यांनी नाशिक येथील एका कंपनीत घडलेल्या धर्मांतराच्या गंभीर घटनेचा दाखला देत, पुण्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी वेळेवर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नमूद केले आहे. गेल्या आठवड्यातही पुणे आणि परिसरात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाईसाठी मिसाळ यांनी पुढाकार घेतला होता. आता आयटी क्षेत्रात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी त्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.