पुण्यात पालखी मुक्काम हलविण्याचा प्रयत्न; नागरिकांमध्ये नाराजी, ३५० वर्षांची परंपरा कायम ठेवण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 20:29 IST2026-04-15T20:28:51+5:302026-04-15T20:29:20+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाला योग्य त्या सूचना देऊन आवश्यक सहकार्य करण्यात येईल ,असे आश्वासन दिले

पुण्यात पालखी मुक्काम हलविण्याचा प्रयत्न; नागरिकांमध्ये नाराजी, ३५० वर्षांची परंपरा कायम ठेवण्याची मागणी
पुणे : संत परंपरेतील पवित्र पालखी सोहळ्यात मागील सुमारे ३५० वर्षांपासून सुरू असलेला भवानी पेठ पालखी विठोबा मंदिर येथील मुक्काम हा परंपरेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुण्यातील मुक्काम स्थळात बदल करू नये अशी ठाम मागणी भाजपचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
भवानी पेठ पालखी विठोबा मंदिर येथील सुमारे ३५० वर्षांपासून सुरू असलेला पालखीचा मुक्काम हलविण्याचा प्रयत्न होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे निवडुंगा विठोबा देवस्थान संस्थानचे विश्वस्त आणि भाजपचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पालखी सोहळ्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, तसेच प्रशासनाच्या माध्यमातून योग्य त्या सुविधा आणि उपाययोजना करण्यात याव्यात, यासाठी विनंती करण्यात आली. तसेच भवानी पेठ येथील पारंपरिक मुक्काम हलवू नये, अशी ठाम मागणी करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाला योग्य त्या सूचना देऊन आवश्यक सहकार्य करण्यात येईल ,असे आश्वासन दिले. पालखी काळात गैरसोय होते हे कारण सांगून पालखीतळ बदलणार असल्याचे सांगितले जात आहे . त्यामुळे ही गैरसोय पुणे महापालिका दुर करणार आहे. तसेच ३५० वर्षांची ही परंपरा खंडित होऊ देऊ नका व भवानी पेठ पालखी विठठल मंदिरातील पालखी मक्काम हलवू नका.संत परंपरा आणि भाविकांच्या श्रद्धेचा मान राखत हा ऐतिहासिक मुक्काम कायम ठेवला जावा, अशी अपेक्षा विशाल धनवडे यांनी व्यक्त केली.