देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 21:02 IST2026-04-15T21:01:20+5:302026-04-15T21:02:27+5:30
Pakistan Financial Crisis: पाकिस्तानात वीज संकट गडद झाले असून सरकारने जनतेची माफी मागितली आहे. आर्थिक मदत आणि कर्जासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ सौदी अरब, तुर्की आणि कतारच्या दौऱ्यावर आहेत.

देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
एकीकडे आर्थिक दिवाळखोरी आणि दुसरीकडे भीषण वीज संकट यामुळे पाकिस्तानची अवस्था दयनीय झाली आहे. जलविद्युत प्रकल्पांमधील उत्पादनात घट झाल्यामुळे देशभरात अतिरिक्त लोडशेडिंग करावे लागत असून, शाहबाज शरीफ सरकारने यासाठी जनतेची जाहीर माफी मागितली आहे. दरम्यान, पंतप्रधान शाहबाज शरीफ बुधवारी सौदी अरबच्या दौऱ्यावर तर लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर इराणच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
पाकिस्तानच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीला सावरण्यासाठी सौदी अरबने ३ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची घोषणा केली आहे. तसेच, पाकिस्तानमध्ये जमा असलेली ५ अब्ज डॉलर्सची रक्कम सध्या परत न घेण्याचा निर्णयही सौदीने घेतला आहे. या कर्जाची पुढील हप्त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शाहबाज शरीफ क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेणार आहेत. इराण आणि इस्रायलमधील संघर्षानंतर अमेरिकेने इराणवर कडक निर्बंध लादले आहेत. अशा परिस्थितीत, जनरल मुनीर यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम होत आहे. हा संघर्ष थांबवण्यासाठी पाकिस्तान आपला प्रभाव वापरण्याच्या प्रयत्नात आहे.
इराण युद्धाच्या सावटाखाली मध्यस्थीचा प्रयत्न
इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान मध्यस्थीची भूमिका बजावत असल्याचे चित्र रंगवत आहे. शाहबाज शरीफ सौदीनंतर तुर्की आणि कतारलाही भेट देणार आहेत. मात्र, देशात जनता लोडशेडिंग आणि महागाईने त्रस्त असताना पंतप्रधान प्रायव्हेट जेटने परदेश दौरे करत असल्याने पाकिस्तानात संताप व्यक्त केला जात आहे.
संरक्षण करार आणि प्रादेशिक सुरक्षा
सौदी अरबसोबतच्या द्विपक्षीय संरक्षण करारांतर्गत पाकिस्तानने अलीकडेच आपल्या युद्धनौका सौदीला पाठवल्या होत्या. या दौऱ्यात द्विपक्षीय सहकार्यासह प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेवरही चर्चा होणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. आर्थिक संकटात सापडलेला पाकिस्तान, या मध्यस्थीच्या माध्यमातून आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारण्याचा आणि पाश्चिमात्य देशांकडून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.