India-China Clash: तवांग सेक्टर: आणखी एक मोठी घडामोड घडलेली; हवाईदलाची सुखोई हवेत झेपावलेली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 12:26 PM2022-12-13T12:26:40+5:302022-12-13T12:32:04+5:30

India-China FaceOff: ९ डिसेंबरला तवांग सेक्टरमध्ये गलवान घाटीसारखीच घटना घडली होती. सैन्याचा आणि देशाच्या सुरक्षेचा विषय असल्याने तीन दिवसांनी या घटनेचा खुलासा झाला आहे. पण त्यापूर्वी तीन आठवड्यांपासून काही गोष्टी घडत होत्या...

भारत आणि चीनदरम्यान तणाव कमालीचा वाढला आहे. चीनने तवांग सेक्टरमधील भारतीय चौकीला उद्धवस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सैनिक पाठविले होते. या झटापटीत सहा भारतीय जवान जखमी झाले आहेत. यावरून भारतातील वातावरण तापलेले असताना याच काळात आणखी एक मोठी घडामोड घडल्याचे समोर येत आहे.

९ डिसेंबरला तवांग सेक्टरमध्ये गलवान घाटीसारखीच घटना घडली होती. सैन्याचा आणि देशाच्या सुरक्षेचा विषय असल्याने तीन दिवसांनी या घटनेचा खुलासा झाला आहे. जवळपास ३०० हून अधिक सैनिकांनी भारतीय सैन्याच्या चौकीला घेरले होते. या हल्ल्यात गलवानसाऱखेच लोखंडी काटेरी रॉ़ड, चाकू, सुरे यांचा वापर झाला होता. भारतीय सैनिकांनी देखील पराक्रम गाजवत या सैनिकांना भारतीय सीमेतून हाकलून लावले आहे.

याच क्षेत्रात चीन गेल्या काही काळापासून हवाई घुसखोरी करण्याचा सतत प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. चीनने गेल्या दोन तीन आठवड्यांपासून अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवर अनेकदा ड्रोन्स पाठविले आहेत. भारतीय हवाई क्षेत्रात घुसखोरी करण्याचा चीन सतत प्रयत्न करत आहे.

या रिपोर्टनुसार चीनची घुसखोरी रोखण्यासाठी हवाई दलाला या क्षेत्रात तैनात असलेली सुखोई पाठवावी लागली होती. संरक्षण मंत्रालयाच्या सुत्रानुसार गेल्या काही आठवड्यांत दोन-तीनदा अशी घटना घडली आहे. सीमेपलिकडून येत असलेले ड्रोन पिटाळून लावण्यासाठी हवाई दलाची सुखोई हवेत झेपावली होती. यासाठी सुखोई -30 एमकेआई या लढाऊ विमानांची मदत घेण्यात आली.

हवाई दल सातत्याने चीनच्या सीमेवर ड्रोन्सच्या हालचालींवर नजर ठेवून आहे. यामुळे भारतीय सैन्यही सावध आहे. जर ड्रोन एलएसीवर उडत असेल तर आम्हाला काही हरकत नाही. परंतू, जर भारतीय हद्दीकडे येत असेल तर रडारवर दिसते आणि त्याला माघारी धाडण्याची कारवाई केली जाते, असे या सुत्राने सांगितले.

हवाईदलाने पूर्वोत्तर राज्यांमध्ये मोठी तयारी केली आहे. आपली सर्व ताकद पणाला लावून हवाई दलाने लढाऊ विमानांचे ताफे तैनात केले आहेत. सध्या आसामच्या तेजपूरपासून ते छाबुआपर्यंत सुखोई ३० फायटर जेट्सची स्क्वाड्रन तैनात आहे.

तसेच पश्चिम बंगालच्या हाशिमारामध्ये राफेल लढाऊ विमाने ठेवण्यात आली आहेत. एवढेच नाही तर रशियाने दिलेले एस-400 मिसाइल डिफेंस सिस्टम देखील आसाममध्ये तैनात करण्यात आली आहे.

भारत आणि चिनी सैनिकांमधील चकमकीच्या मुद्द्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बोलावलेली उच्चस्तरीय बैठक आता संपली आहे. या बैठकीत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान आणि तिन्ही लष्कर प्रमुख, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली.

भारतीय लष्कराने शौर्य दाखवत चिनी सैनिकांना रोखले. आमचा एकही सैनिक मरण पावला नाही किंवा कोणीही गंभीर जखमी झाले नाही. अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर पीएलएचे सैनिक माघारी परतले. 11 डिसेंबर रोजी, भारताच्या लष्करी अधिकाऱ्यांनी पीएलएच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि या घटनेबाबत चर्चा केली. त्यांना सीमेवर शांतता राखण्यास सांगण्यात आले आहे, असे लोकसभेत उत्तर देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.