CoronaVirus News: धक्कादायक! देशातील 50%वर कोरोनाबाधित फक्त 6 शहरांत, महाराष्ट्रातल्या तीन बड्या शहरांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 06:44 PM2020-06-14T18:44:38+5:302020-06-14T19:44:35+5:30

कोरोना बाधितांचा विचार करता आता भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. येथील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 3 लाखांचा टप्पाही ओलांडला आहे. भारताच्या आधी केवळ अमेरिका, ब्राझील आणि रशियाचा क्रमांक लागतो. देशाचा विचार करता महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. येथे तब्बल 32 टक्के रुग्ण आढळून आले आहेत.

महाराष्ट्रात आतापर्यंत एक लाखहून अधिक कोरोनाबाधित समोर आले आहेत. महाराष्ट्राला जोडूनच तामिळनाडूचाही विचार केला, तर या दोघांमध्येच देशातील एकूण रुग्णांच्या 45 टक्के रुग्ण आहेत.

देशातील मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई आणि ठाण्याचा विचार करता येथे देशातील एकूण रुग्णांच्या जवळापस 50 टक्के रुग्ण आहेत.

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथे तब्बल 55,450 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. हा आकडा जगातील स्वीडन, नेदरलँड, इजिप्त, यूएई या मुख्य देशांपेक्षाही अधिक आहे. येथे आतापर्यंत कोरोनाने जवळपास 2 हजार लोकांचा बळी घेतला आहे.

दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीही कोरोनाचा सामना करत आहे. येथे शनिवारी तब्बल 36,824 रुग्ण होते. यापैकी 13 हजार रुग्ण बरे झाले आहेत. तर 1,214 जणांचा मृत्यू झाला आहे.

चेन्नई - या महानगरालाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. येथे जवळपास 27 हजार कोरोनाबाधित आहेत. तामिळनाडूतील तब्बल 70 टक्के रुग्ण येथेच आहेत. तामिळनाडूत आतापर्यंत जवळपास 40,698 कोरोनाबाधित समोर आले आहेत.

ठाणे - महाराष्ट्रातील या मोठ्या शहरालाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. येथे आतापर्यंत 16 हजार कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर 400हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

अहमदाबाद - गुजरातमधील अर्ध्यावर रुग्ण एकट्या अहमदाबादमध्ये आहेत. येथे जवळपास 16 हजार रुग्ण समोर आले आहेत. तर संपूर्ण गुजरातमध्ये 22,527 कोरोनाबाधित आहेत.

पुणे - महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या येथील शहरेच वाढवत आहेत. येथील पुण्यात आतापर्यंत 11 हजार कोरोनाबाधित समोर आले आहेत, तर तब्बल 459 जणांचा मृत्यू झाला आहे.

यामुळे शहरं बनतायत कोरोना संक्रमणाची मोठी केंद्र - कोरोना संक्रमित रुग्ण शहरी भागांतच आढळण्याची अनेक कारणे आहेत. जसे शहरांच्या लोकसंख्येची घनता अधिक असणे, ग्रामिण भागाच्या तुलनेत शहरी भागांतील लोकांना कामावर जाणे आवश्यक असते, शेजारची व्यक्तीही कोरोनाबाधित असली तरी लवकर समजत नाही, अशी अनेक कारणे सांगता येतात.