आजपासून 200 विशेष रेल्वे धावणार; प्रवाशांसाठी 'या' खबरदारीच्या सूचना…

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 10:49 AM2020-06-01T10:49:02+5:302020-06-01T11:02:27+5:30

देशात 1 जूनपासून 2020 पासून देशात विशेष रेल्वे धावणार आहेत. या रेल्वे श्रमिक विशेष रेल्वेगाड्यांच्या व्यतिरिक्त असणार आहेत.

या रेल्वे गाड्यांचे तिकीट आयआरसीटीसीचे संकेतस्थळ आणि मोबाईल अॅपसह रिझर्व्हेशन काऊंटर आणि तिकीट एजंट्सकडून प्राप्त करता येणार आहे.

24 मेला पहिल्या लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर देशातली रेल्वे सेवा थांबविण्यात आली होती. आता ही सेवा सुरू होत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

या पहिल्या टप्प्यात देशातल्या निवडक मार्गावर 200 रेल्वे गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्याचा टाईम टेबलही रेल्वेने प्रसिद्ध केले आहे.

या रेल्वे गाड्यांचे बुकिंग 21 मे रोजी रेल्वेने सुरू केले होते. आरक्षणाचा कालावधी आता 30 दिवसांवरून 120 दिवस करण्यात आला आहे.

याचबरोबर, आजारी व्यक्ती, लहान मुले यांनी प्रवास टाळावा असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. तसेच रेल्वेचा प्रवास करताना प्रवाशांना काही नियम पाळणेही सक्तीचे करण्यात आलं आहे.

त्यानुसार, केवळ कन्फर्म/आरएसी तिकीट असलेल्या प्रवाशांना स्थानकात येण्याची तसेच रेल्वेत प्रवेशाची अनुमती मिळणार आहे.

प्रवाशांना रेल्वे रवाना होण्याच्या 90 मिनिटांपूर्वी रेल्वेस्थानकावर पोहोचवावे लागणार आहे. रेल्वेस्थानकावर प्रवेश तसेच बाहेर पडताना स्क्रीनिंग होईल. याचबरोबर, सदैव मास्क परिधान करावे लागणार आहे.

रेल्वे प्रवाशांकडून कुठल्याही प्रकारचे कॅटरिंग शुल्क आकारणार नाही. रेल्वेत प्रवाशांना ब्लँकेट, चादर किंवा उशी मिळणार नाही.

याशिवाय, प्रवाशांनी आरोग्य सेतू अॅप इन्स्टॉल करावा. तसेच, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

200 विशेष रेल्वेगाड्यांचे प्रवासभाडे सामान्य असणार आहे.आरक्षित असल्याने जनरल डब्यांसाठी सेकंड सीटिंगचे (2एस) प्रवासभाडे आकारले जाणार आहे.

तसेच, सर्व प्रवाशांना आसन उपलब्ध केले जाणार आहे. या रेल्वेगाड्यांमध्ये पार्सल आणि सामानाचेही बुकिंग होऊ शकेल.

Read in English