कोलकाता नाईट रायडर्स आणि गुडरात टाययन्स यांच्यात काल (१६ मे २०२६) ईडन गार्डनवर खेळवण्यात आलेल्या सामन्याची टी-२० क्रिकेटच्या इतिहासात नोंद झाली. या सामन्यात दोन्ही संघांतील प्रत्येकी तीन फलंदाजांनी अर्धशतक झळकावले. म्हणजेच, एकाच टी-२० सामन्यात तब्बल सहा फलंदाजांनी ५० धावांचा टप्पा पार करण्याची ही क्रिकेट इतिहासातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे हा सामना प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरला.
प्रथम फलंदाजी करताना कोलकाताच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. सलामीवीर फिन ॲलनने अवघ्या ३५ चेंडूत ९३ धावांची तुफानी खेळी केली. फिन ॲलन बाद झाल्यानंतर युवा फलंदाज अंगकृश रघुवंशीने नाबाद ८२ धावांची दमदार खेळी साकारली. तर, कॅमेरॉन ग्रीन ५२ धावांवर नाबाद राहिला. या तुफानी फलंदाजीच्या जोरावर केकेआने २० षटकांत केवळ दोन विकेट्स गमावत २४७ धावांचा डोंगर उभा केला.
या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सनेही हार मानली नाही. कर्णधार शुभमन गिलने ४९ चेंडूंमध्ये ८५ धावांची शानदार खेळी करत संघाला विजयाच्या आशा दाखवल्या. त्याला जोस बटलरयाने (५७ धावा) महत्त्वपूर्ण साथ दिली, तर साई सुदर्शन ५३ धावांवर नाबाद राहिला. मात्र, केकेआरच्या गोलंदाजांनी निर्णायक क्षणी अचूक मारा करत गुजरातला २० षटकांत ४ बाद २१८ धावांपर्यंतच रोखले.
पुढील सामने कधी?
कोलकाता नाईट रायडर्सचे साखळी फेरीतील अजून दोन सामने बाकी आहेत. केकेआर आता २० मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध आणि २४ मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मैदानात उतरणार आहे. तर,गुजरात टायटन्सचा साखळी फेरीतील अखेरचा सामना पाच वेळचे विजेते चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध होणार आहे.