“Air India मध्ये आपले मनापासून स्वागत आहे”; रतन टाटांनी दिला प्रवाशांना खास संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 04:45 PM2022-02-02T16:45:51+5:302022-02-02T16:51:39+5:30

टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी एअर इंडिया प्रवाशांसाठी एक खास संदेश दिला आहे. जाणून घ्या...

अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर Air India ची मालकी अखेर TATA समुहाकडे सोपविण्यात आली. एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली. एअर इंडियामधील सरकारचा समभाग टाटा सन्सची उपकंपनी टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे हस्तांतरीत करण्यात आला.

यानंतर TATA समूहाने कमान हातात घेत Air India ची उड्डाने, परिचालन, व्यवस्थापन सुरू केले आहे. टाटा ग्रुपने लगेचच महत्त्वाचे बदल करत एअर इंडिया सेवेतील दर्जा वाढवण्यावर भर दिल्याचे बोलले जात आहे.

Air India ने ट्विटच्या माध्यमातून TATA ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांच्या आवाजातील एक ऑडिओ संदेश शेअर केला आहे. एअर इंडियामध्ये आपले स्वागत आहे. सर्वांना सोबत घेऊन एअर इंडियाला सर्वाधिक लोकप्रिय एअरलाइन बनवले जाईल, असा विश्वास रतन टाटा यांनी यामध्ये व्यक्त केला आहे.

खुद्द रतन टाटा यांच्या आवाजात असलेल्या या संदेशात पुढे म्हटले आहे की, टाटा ग्रुप एअर इंडियाच्या नव्या ग्राहकांचे मनपासून स्वागत करत आहे. Air India परिचालन, सुविधा आणि सेवा यांमध्ये सर्वांच्या पसंतीस उतरण्यासाठी एकत्रपणे काम करण्यास TATA ग्रुप उत्सुक आहे.

आता Air India ची मालकी अधिकृतपणे TATA कंपनीकडे गेली आहे. टाटा समूहाच्या एका भागाच्या रुपात एअर इंडियासाठी आता नवा चॅप्टर सुरू होत आहे. प्रवास पुढे नेण्यासाठी आता दोन आयकॉनिक नावे एकत्र आली आहेत. आपल्या देशसेवेची मोहीम आणि आमचा बहुमूल्य वारसा सोबत काम करण्यासाठी उत्साहित आहेत. टाटा कंपनीचं स्वागत, असे ट्वीट एअर इंडियाने केले.

TATA सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनीदेखील कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. ते म्हणाले की, Air India ची मालकी टाटा कंपनीकडे येण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एअर इंडियाच्या घरवापसीचा आम्हाला खूप आनंद आहे. एअर इंडियाला वर्ल्ड क्लास दर्जाची एअरलाइन्स कंपनी बनवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

दुसरीकडे, TATA ने आपला शब्द पाळला आणि सर्व कर्मचाऱ्यांना पहिली भेट दिली ती म्हणजे Air India च्या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि रिटायरमेंट फंडची. टाटाच्या हाती कंपनी जाताच ईपीएफओने एअर इंडियाला लगेचच ऑनबोर्ड केले आहे. यामुळे एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना अधिकच्या पीएफचा लाभ मिळाला आहे.

Air India च्या कर्मचाऱ्यांना आता २ टक्के जास्तीचा पीएफ मिळणार आहे. खासगी कंपनी झाल्याने कर्मचाऱ्यांना पीएफ कायदा १९२५ चा फायदा मिळणार आहे. यामुळे आधी १०-१० टक्के असलेले कॉन्ट्रीब्युशन १२-१२ टक्के होणार आहे. याशिवाय अकाली मृत्यू झाल्यास, कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला पेन्शनचा लाभ दिला जाईल. याशिवाय कर्मचार्‍यांना 2.5 लाख ते 7 लाख रुपयांपर्यंतचा जीवन विमा मिळेल, ज्यासाठी कोणताही प्रीमियम भरावा लागणार नाही.

सातत्याने तोट्यात असलेली आणि कर्जाच्या ओझ्याने वाकलेली Air India ही हवाई वाहतूक कंपनी TATA ने १८ हजार कोटी रुपयांना खरेदी केली. Air India च्या सर्व मालमत्ता आणि कंपनीवर असलेल्या सुमारे १५ हजार ३०० कोटींच्या कर्जासह TATA ने १८ हजार कोटी रुपयांची बोली लावली.

TATA समूहाचा सध्या ‘एअर एशिया’ आणि ‘विस्तारा’ या कंपन्यांत मोठा वाटा आहे. आता ही तिसरी कंपनी त्यांच्याकडे आली आहे. मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंत अनेक उत्पादने तयार करणाऱ्या टाटा समूहाची ही एक दिमाखदार कामगिरी मानली जाते. एअर इंडियाला कर्जबाजारीपणातून बाहेर काढण्याचे आव्हान आता त्यांच्यापुढे आहे.

‘इंडियन एअरलाइन्स’मध्ये २००७ मध्ये विलीनीकरणानंतर Air India चा तोटा वाढला. आता TATA ला देशांतर्गत ४४०० आणि आंतरराष्ट्रीय १८०० उड्डाणांचे व पार्किंग जागांचे नियंत्रण मिळणार आहे. परदेशात पार्किंगचे ९०० स्लॉट मिळणार आहेत. मालवाहतूक आणि विमानतळांवरील इतर सेवांत टाटा समूहाला १०० टक्के तसेच ५० टक्के वाटा मिळणार आहे.

Air India कडे आताच्या घडीला ५८ एअरबस, A320 फॅमिली विमाने, १४ बोइंग 777, २२ B787 ड्रीमलाइनर आणि AI एक्सप्रेसची २४ B737 एअरवर्थ असा विमानांचा भरगच्च ताफा आहे. हा सर्व ताफा TATA सन्सला मिळणार आहे.