भीषण अपघात! गुजरातमध्ये ट्रक आणि कारची जोरदार धडक; राजस्थानच्या ७ जणांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 08:52 IST2026-01-25T08:51:26+5:302026-01-25T08:52:18+5:30
गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात शनिवारी भीषण अपघात झाला आहे. अपघातात राजस्थानच्या ७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

फोटो - ndtv.in
गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात शनिवारी भीषण अपघात झाला आहे. अमीरगड तालुक्यातील इक्बालगड गावाजवळ पालनपूर-आबू रोड हायवेवर झालेल्या अपघातातराजस्थानच्या ७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयानक होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानकडून येणारा एक ट्रक भरधाव वेगात होता. अचानक ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक डिव्हायडर तोडून चुकीच्या दिशेने गेला. याच दरम्यान समोरून येणाऱ्या कारची आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारचं प्रचंड नुकसान झालं.
अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण १० प्रवासी होते. धडक बसल्यानंतर ७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.
अपघातानंतर पालनपूर-आबूरोड हायवेवर दोन्ही बाजूंनी सुमारे ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्यावर अपघातग्रस्त वाहन असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून क्रेनच्या साहाय्याने ट्रक आणि कार बाजूला केली, त्यानंतर बऱ्याच प्रयत्नांनंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.
बनासकांठाचे पोलीस अधीक्षक प्रशांत सुंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक डिव्हायडर ओलांडून चुकीच्या दिशेने आला होता. ट्रकच्या धडकेमुळे कारमधील ७ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ३ जण गंभीर जखमी आहेत. सर्व मृत राजस्थानच्या पाली आणि सिरोही जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.