सरकारी इंधन कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी जेट फ्युअलच्या किंमतीत मे महिन्याच्या सुरूवातील वाढ केली होती. सलग दुसऱ्या महिन्यात ही वाढ करण्यात आली होती. दरम्यान आता महाराष्ट्र सरकारनं 'एव्हिएशन टर्बाइन फ्युएल' म्हणजेच एटीएफवरील व्हॅटमध्ये कपात करत कंपन्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. ही व्हॅटमधील कपात १४ नोव्हेंबरपर्यंत देण्यात आलेली असून कराचा दर १८ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलाय. विमान क्षेत्रासाठी अत्यंत नाजूक अशा वेळी हा निर्णय घेण्यात आल्यामुळे कंपन्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील बिघडलेल्या परिस्थितीनंतर भारतातील विमान कंपन्यांवरही दबाव वाढत होता.
शासनानं १४ मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हा नवीन कराचा दर १५ मे २०२६ पासून लागू झाला असून तो १४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अंमलात राहील. या निर्णयामुळे व्हॅटमध्ये तब्बल ११ टक्क्यांची कपात झाली असून, महाराष्ट्रातून उड्डाण करणाऱ्या विमान कंपन्यांचा इंधनावरील खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे.
विमान कंपन्यांवरील ताण कमी होणार
भारतीय विमान कंपन्यांच्या एकूण खर्चापैकी ३५ ते ४० टक्के खर्च हा एकट्या इंधनावर होतो. सध्या मध्य आशियातील तणावामुळे अनेक विमानांच्या मार्गात बदल झाले आहेत, तर काही ठिकाणी हवाई क्षेत्रावर निर्बंध आले आहेत. इतकंच काय तर एटीएफच्या किमतीही वाढल्या आहेत. अशा कठीण समयात राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे विमान कंपन्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाचे प्रयत्न
मध्य आशियातील संकट आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं सर्वाधिक व्हॅट असणाऱ्या दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र सरकारसोबत कर कमी करण्याबाबत बैठका घेतल्या होत्या. तामिळनाडूमध्ये एटीएफवर २९%, दिल्लीत २५% तर महाराष्ट्रात १८% व्हॅट लागू होता.
Due to the West Asia crisis, the Indian aviation industry is facing certain issues like air space closures, uncertain operations, spike in ATF prices. During these times, under the leadership of Hon'ble PM Shri @narendramodi ji, the government of India has given multiple respites… pic.twitter.com/Ayd671wWbq
— Ram Mohan Naidu Kinjarapu (@RamMNK) May 15, 2026
केंद्रीय मंत्र्यांनी मानले आभार
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत महाराष्ट्र सरकारचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. "सध्या विमान वाहतूक क्षेत्र मध्य आशियातील संकटामुळे हवाई क्षेत्राची बंदी आणि इंधनाच्या वाढत्या किमती अशा आव्हानांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारनं तातडीनं पावलं उचलत व्हॅट १८% वरून ७% केला, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. महाराष्ट्रात १६ विमानतळ कार्यरत असून वर्षाला सुमारे ७.५ कोटी प्रवासी येथून प्रवास करतात. सरकारच्या या निर्णयामुळे विमान कंपन्यांना मदत होईल आणि जागतिक दबावानंतरही विमान भाडं नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल," ते म्हणाले.
