भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 14:31 IST2026-05-15T14:28:33+5:302026-05-15T14:31:01+5:30
पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीला असलेले संभाव्य धोके या पार्श्वभूमीवर भारताने एक जोरदार संदेश दिला आहे. ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत बोलताना एस. जयशंकर यांनी सांगितले की, होर्मुझची सामुद्रधुनी आणि लाल समुद्र यांसारख्या सागरी मार्गांची सुरक्षा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
नवी दिल्लीत पार पडलेल्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारताने पश्चिम आशियातील संघर्षावर चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले की, होर्मुझची सामुद्रधुनी आणि लाल समुद्रासारख्या आंतरराष्ट्रीय जलमार्गांवर निर्माण झालेला धोका जागतिक अर्थव्यवस्थेसाठी संकट ठरू शकतो. इराण आणि संयुक्त अरब अमिरातीच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत भारताने 'संवाद आणि मुत्सद्देगिरी' हाच एकमेव मार्ग असल्याचे पुन्हा एकदा ठणकावून सांगितले.
पश्चिम आशियातील संघर्ष आता केवळ दोन देशांपुरता मर्यादित राहिला नसून त्याचे पडसाद जागतिक व्यापारावर उमटत आहेत. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर केलेली नाकेबंदी आणि व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले यामुळे तेल पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. भारताने नुकत्याच ओमानजवळ भारतीय जहाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत, नागरी खलाशांना लक्ष्य करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
दुसरीकडे, इराण आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. युएईमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ असणे आणि इस्रायली नेत्यांच्या गुप्त भेटींच्या दाव्यांमुळे इराण संतापलेला आहे. अशा परिस्थितीत भारताने दोन्ही बाजूंना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.
काही दिवसापूर्वी भारताने ओमानजवळ भारतीय ध्वज असलेल्या जहाजावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, व्यापारी जहाजे आणि नागरी खलाशांना लक्ष्य करणे "अस्वीकार्य" आहे. जहाजावरील सर्व भारतीय कर्मचारी सुरक्षित असून ओमानच्या अधिकाऱ्यांनी त्यांची सुटका केली, असेही भारताने सांगितले होते.
इराण आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील तणाव वाढला
गेल्या काही महिन्यांत इराण आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील संबंध बिघडले आहेत. तेहरानने संयुक्त अरब अमिरातीवर अमेरिकेचे लष्करी तळ उभारल्याचा आरोप केला. दरम्यान, युद्धविराम झाल्यानंतरही इराणने आखाती देशांना, संयुक्त अरब अमिरातीला लक्ष्य करणे सुरूच ठेवले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने दावा केला की, त्यांनी युद्धादरम्यान संयुक्त अरब अमिरातीला गुप्त भेट दिली होती, यामुळे इराणचा संताप आणखी वाढला.
या परिस्थितीत भारताने संतुलित भूमिका घेण्याचा प्रयत्न केला. जयशंकर यांनी ऊर्जा संकट, सागरी व्यापारातील अडथळे आणि एकतर्फी निर्बंध हे मुद्देही उपस्थित केले. ते अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांचा उल्लेख करत असल्याचे मानले जाते. "कोणत्याही संघर्षावर संवाद आणि मुत्सद्देगिरी हेच एकमेव शाश्वत उपाय आहेत, असेही ते म्हणाले.