बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 17:11 IST2026-05-15T17:10:48+5:302026-05-15T17:11:14+5:30
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एकाच कुटुंबातील ९ जणांना कलिंगड आणि मॅगी खाल्ल्याने विषबाधा झाली आहे.

बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
उन्हाळ्याच्या दिवसांत संसर्गजन्य आजारांचा धोका वाढलेला असतानाच, उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून एक धक्कादायक आणि तितकीच डोळे उघडणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तब्बल नऊ जणांनी आधी कलिंगड आणि त्यानंतर अवघ्या दीड तासाने मॅगी खाल्ली. या दोन्ही पदार्थांच्या सेवनानंतर काही वेळातच संपूर्ण कुटुंबाला उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. प्रकृती खालावल्यामुळे या नऊही जणांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि खाण्यापिण्याच्या सवयींबाबत मोठी चिंता व्यक्त होत आहे.
७० वर्षांच्या आजोबांपासून ८ वर्षांच्या चिमुरडीपर्यंत सगळेच आजारी
ही खळबळजनक घटना गोरखपूरमधील एका गावात घडली. विषबाधा झालेल्यांमध्ये ७० वर्षांच्या वृद्धापासून ते ८ वर्षांच्या लहान मुलीचा समावेश आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका चिमुरडीने सांगितले की, "गुरुवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास सर्वांनी मिळून कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर सुमारे दीड तासाने मॅगी खाल्ली. मॅगी खाताच अचानक पोटात कळा येऊ लागल्या आणि उलट्या-जुलाब सुरू झाले. त्यानंतर घरातील इतरांचीही प्रकृती एकापाठोपाठ एक बिघडत गेली." आधी सर्वांना गावातील स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे फरक न पडल्याने सर्वांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
कलिंगड की मॅगी? नक्की विळखा कशाचा?
गोरखपूर जिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर बी. के. सुमन यांनी सांगितले की, सर्व नऊ रुग्णांना रुग्णालयाच्या न्यू ओपीडी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एका मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर इतरांची प्रकृती आता स्थिर आहे. "सर्व रुग्णांनी आधी कलिंगड आणि नंतर मॅगी खाल्ल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यांची तब्येत कलिंगडामुळे बिघडली की मॅगीमुळे, हे अचूक तपासणी अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल," असे डॉक्टरांनी सांगितले.
फळं पिकवण्याचे केमिकल असू शकतं कारण!
या घटनेबाबत डॉक्टरांनी एक अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे. उन्हाळ्याच्या आणि संसर्गजन्य आजारांच्या दिवसांत पॅकेटबंद अन्न किंवा फळे खाताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकदा कलिंगड सारखी फळे लवकर पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जातो. तसेच पॅकेटबंद फूड एक्स्पायरी डेट संपलेले असू शकते. या दोन्ही गोष्टी शरीरासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे नागरिकांनी नेहमी विश्वासू दुकानातूनच खरेदी करावी आणि एक्स्पायरी डेट तपासूनच पदार्थांचे सेवन करावे, असे आवाहन वैद्यकीय प्रशासनाने केले आहे.