तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 19:31 IST2026-05-06T19:28:30+5:302026-05-06T19:31:42+5:30
सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसने थलपती विजयच्या पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे.

तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
Tamil Nadu Politics:तामिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप झाला आहे. अभिनेता ते नेता असा प्रवास करणाऱ्या थलापती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाने १०८ जागा जिंकून सर्वांना धक्का दिला. मात्र, बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११८ या आकड्यापासून विजय १० जागा दूर आहेत. अशा परिस्थितीत, भाजप आणि मित्रपक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने विजय यांच्या सरकारला पाठिंबा देण्याचे जाहीर केले. मात्र, काँग्रेसच्या या निर्णयामुळे २०१३ च्या दिल्ली निवडणुकीतील आठवणी ताज्या झाल्या असून, काँग्रेस पुन्हा तीच ऐतिहासिक चूक करत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
काँग्रेसचा निर्णय आणि दिल्लीतील इतिहासाची पुनरावृत्ती?
२०१३ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यावेळी भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने नवख्या आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला होता. अरविंद केजरीवाल पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. मात्र, पुढच्या काही वर्षांत आपने दिल्लीत काँग्रेसचा मतदार आपल्या बाजूने खेचून घेतला. त्यामुळे एकेकाळी दिल्लीवर सत्ता गाजवणारी काँग्रेस २०१५ मध्ये शून्यावर आली. आता तामिळनाडूमध्येही काँग्रेस भाजपला रोखण्यासाठी विजय यांना पाठिंबा देत आहे, जे दिल्लीत घडलं तसंच वाटत आहे.
सत्तेचे समीकरण आणि मित्रपक्षांची नाराजी
२३४ सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी ११८ जागांची गरज आहे. विजय यांच्याकडे १०८ आमदार आहेत. काँग्रेसच्या ५ आमदारांच्या पाठिंब्यामुळे हा आकडा ११३ वर पोहोचतो. बहुमतासाठी आवश्यक उर्वरित जागांसाठी सीपीआय, सीपीएम आणि व्हीसीकेसारख्या पक्षांच्या पाठिंब्यावर विजय यांची नजर आहे.
डीएमके संतप्त
काँग्रेस सध्या द्रमुकसोबत आघाडीत आहे. मात्र, काँग्रेसने विजय यांच्याशी हातमिळवणी केल्याने द्रमुक प्रचंड नाराज झाली आहे. द्रमुकचे प्रवक्ते सरवणन अण्णादुराई यांनी काँग्रेसवर पाठीत खंजीर उपसल्याचा आरोप केला.
काँग्रेससमोर नेमका धोका काय?
राजकीय विश्लेषकांच्या मते, काँग्रेस समोर सर्वात मोठे संकट स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचे आहे. दिल्लीत ज्याप्रमाणे आपने काँग्रेसचे मतदार आपल्याकडे वळवले, तसेच तामिळनाडूमध्ये थलापती विजय हे तरुण चेहरा म्हणून समोर आले आहेत. जर त्यांचे सरकार यशस्वी ठरले, तर काँग्रेसचा पारंपारिक मतदार त्यांच्याकडे सरकण्याची मोठी शक्यता आहे. तसेच गुजरातमध्येही आपच्या एन्ट्रीमुळे काँग्रेसच्या मतांचे नुकसान झाले होते. आता तामिळनाडूमध्येही नव्या प्रादेशिक चेहऱ्याला ताकद देऊन काँग्रेस स्वतःचीच राजकीय अस्तित्व धोक्यात घालत असल्याची चर्चा आहे.