'मंत्रालयात लक्ष्मीदर्शन, शेतकरी विकताहेत किडनी'; विरोधकांचा महायुती सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 05:42 IST2026-02-23T05:37:40+5:302026-02-23T05:42:11+5:30
आम्ही झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी अधिवेशनात उचलून धरू असे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सांगितले.

'मंत्रालयात लक्ष्मीदर्शन, शेतकरी विकताहेत किडनी'; विरोधकांचा महायुती सरकारवर हल्लाबोल
मुंबई : मंत्रालयात मंत्र्यांच्या दालनात लाच घेतली जात आहे अन् दुसरीकडे शेतकऱ्यांवर कर्ज फेडण्यासाठी किडनी विकण्याची पाळी येत आहे. दुसरीकडे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी विरोधी पक्षनेताच दोन्ही सभागृहात असू नये अशी सत्तापक्षाची दादागिरी सुरू असल्याची सडकून टीका करत विरोधी पक्षांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू हा घात की अपघात याची चौकशी करण्याची मागणीही विरोधकांनी केली आहे.
काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या नेत्यांची रविवारी दुपारी बैठक झाली आणि नंतर पत्रपरिषद झाली. अन्न व औषधी प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या पीएला लाच घेताना त्यांच्याच दालनात अटक झाली, सरकारचा कारभार किती भ्रष्ट आहे हे त्यावरून दिसते. आम्ही झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी अधिवेशनात उचलून धरू असे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सांगितले.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, उद्धवसेनेचे नेते आ. आदित्य ठाकरे, आ. भास्कर जाधव, अनिल परब, काँग्रेसचे नेते सतेज पाटील पत्रपरिषदेला उपस्थित होते.
वडेट्टीवार म्हणाले की, अजित पवार यांचा मृत्यू हा घातपात की अपघात याबाबत राज्यात अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. अजित दादा यांच्या मृत्यूनंतर शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला. इतकी घाई कुणाला होती? जर ही प्रक्रिया योग्य होती तर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती का दिली? शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, आश्वासन देऊनही सरकार कर्जमाफी देत नाही. शेतकऱ्यांवर किडनी विकण्याची पाळी आली आहे.
पुरावे देऊनही सरकार कारवाई करत नाही -जाधव
भास्कर जाधव म्हणाले की, झिरवाळ यांचा राजीनाम्याचा मुद्दा आम्ही लावून धरू. उच्चपदस्थ मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या ड्रग्ज फॅक्टरीवर पोलिसांनी धाड टाकली, पण त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. मंत्री संजय शिरसाठ, योगेश कदम यांच्याविरोधात पुरावे देऊनही सरकार कारवाई करत नाही.
आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःला इन्फ्रामॅन म्हणून स्वतःचे मार्केटिंग करत आहे, पण मुलुंडमध्ये मेट्रोमधील स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला. विधानसभा अध्यक्षांची दादागिरी सुरू आहे. बहुमताचे सरकार असूनही त्यांना विरोधी पक्षाची भीती का आहे?
शक्तिपीठ महामार्गावर आक्षेप
काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी आरोप केला की, शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी स्पष्ट विरोध केला तरी जमीन मोजणीचे काम सरकारने सुरू केले आहे. परभणी इथे तर शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली.