Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 13:33 IST2026-05-13T13:31:58+5:302026-05-13T13:33:16+5:30
Bihar Nalanda Shocking News: बिहारच्या नालंदा जिल्ह्यात लिंबू तोडल्याच्या रागातून एका १२ वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली असून याप्रकरणी १२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
बिहारच्यानालंदा जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली. घराच्या आवारातील लिंबाच्या झाडावरून लिंबू तोडल्याच्या किरकोळ कारणावरून एका १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
नेमकी घटना काय?
मृत मुलाचे नाव शुभम कुमार असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुभमने गावातील गोरे खान यांच्या घराच्या आवारात असलेल्या लिंबाच्या झाडावरील एक लिंबू तोडले होते. मात्र, या क्षुल्लक कारणावरून गोरे खान यांच्या दोन्ही मुलांनी संताप व्यक्त करत शुभमला बेदम मारहाण केली. या मारहाणीत शुभम गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
घटनेची माहिती गावात पसरताच परिसरात संतापाची लाट उसळली. शुभमच्या नातेवाईकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. संतप्त जमावाने काही वाहनांची तोडफोड केली तसेच दगडफेकही केल्याचे सांगितले जात आहे. परिस्थिती चिघळत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काही ठिकाणी लाठीमार केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या घटनेनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.
१२ जणांना अटक
या प्रकरणी पोलिसांनी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटकेत घेतलेल्या संशयितांची चौकशी सुरू असून, घटनेमागील नेमके कारण आणि संपूर्ण घडामोडींचा तपास पोलीस करत आहेत. एका किरकोळ वादातून निष्पाप मुलाचा जीव गेल्याने संपूर्ण परिसर हादरला असून, या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.