तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 13:48 IST2026-05-13T13:47:06+5:302026-05-13T13:48:03+5:30
तमिळनाडूच्या राजकारणात सुपरफास्ट घडामोडी; मुख्यमंत्री विजय यांनी ज्योतिषाची नियुक्ती २४ तासांत रद्द केली

तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
Tamil Nadu Govt revokes OSD Astrologer: तमिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री आणि तमिळगा वेत्री कझगमचे सर्वेसर्वा थलपती जोसेफ विजय यांनी सत्तेची सूत्रे हाती घेताच घेतलेल्या एका निर्णयाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली. विजय यांनी आपले निकटवर्तीय, प्रसिद्ध ज्योतिषी आणि पक्षाचे प्रवक्ते रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांची मुख्यमंत्री कार्यालयात विशेष राजकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, मित्रपक्षांचा तीव्र विरोध आणि टीकेची झोड उठल्यानंतर २४ तासांत ही नियुक्ती रद्द करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे.
मंगळवारी प्रधान सचिवांनी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांची मुख्यमंत्री विजय यांचे राजकीय सल्लागार आणि समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राजकीय रणनीती आणि प्रशासकीय कामात समन्वय राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. एका ज्योतिषाला थेट सरकारी यंत्रणेत महत्त्वाचे पद दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. विरोधकांसह मित्रपक्षांनीही या निर्णयाला विरोध केला. त्यानंतर आता बुधवारी यासंदर्भात अधिकृत निवेदन काढून नियुक्ती रद्द करण्यात आली.
कोण आहेत रिकी राधन पंडित वेट्रिवेल?
तिरुपूर जिल्ह्यातील उथुकुली येथील रहिवासी असलेल्या वेट्रिवेल यांना ज्योतिष, अंकशास्त्र आणि ध्यानाचा ४० वर्षांहून अधिक अनुभव आहे. १९८९ मध्ये त्यांनी जयललिता मुख्यमंत्री बनतील, अशी भविष्यवाणी केली होती जी १९९१ मध्ये खरी ठरली. त्यानंतर जयललिता त्यांना आपले वैयक्तिक ज्योतिषी मानू लागल्या होत्या. विजय यांनी जेव्हा स्वतःचा पक्ष स्थापन केला, तेव्हापासून वेट्रिवेल त्यांच्यासोबत सावलीसारखे आहेत. २०२६ च्या निवडणुकीत विजय मुख्यमंत्री होतील, हे त्यांनी आधीच सांगितले होते. पक्षाची निवडणूक रणनीती आणि सभांच्या तारखाही त्यांच्या सल्ल्यानेच ठरवल्या जात होते.
२०२६ च्या विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकून विजय यांनी काँग्रेस,व्हीसीके, सीपीआय यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले आहे. मात्र, वेट्रिवेल यांच्या नियुक्तीमुळे मित्रपक्षांमध्ये नाराजी पसरली. आमदार वाणी अरासू यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावापूर्वी सरकारला आमच्या सरकारने वैज्ञानिक विचारांना महत्त्व दिले पाहिजे, अंधश्रद्धा किंवा ज्योतिषशास्त्राला नाही, अशा शब्दात सुनावले.
मित्रपक्षांचा वाढता दबाव आणि ज्योतिषाची सरकारी पदावर नियुक्ती केल्याने टीका होत असल्याचे पाहून, मुख्यमंत्री विजय यांनी तातडीने वेट्रिवेल यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश दिले.