सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 13:21 IST2026-05-13T13:21:21+5:302026-05-13T13:21:43+5:30
उत्तर प्रदेशातील चंदौलीमध्ये एन्काउंटरमध्ये ठार झालेला गुरप्रीत सिंह ७ आणखी लोकांच्या हत्येच्या तयारीत होता.

सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
उत्तर प्रदेशातील चंदौली येथे पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये ठार झालेला निवृत्त लष्करी जवान गुरप्रीत सिंह हा साधा गुन्हेगार नव्हता, तर तो एक भयानक 'सायको किलर' होता. पोलीस तपासात जो धक्कादायक खुलासा झाला आहे, तो ऐकून कोणाचाही अंगावर काटा येईल. अवघ्या २५ तासांत ३ निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या गुरप्रीतच्या निशाण्यावर आणखी ७ लोक होते. जर त्याला वेळीच रोखले नसते, तर हा नरसंहार मोठा झाला असता.
गुरप्रीतने ज्या पद्धतीने तिन्ही हत्या केल्या, त्यावरून तो एका विशिष्ट पॅटर्नवर काम करत होता. त्याच्याकडे एकूण १० काडतूसं होती. त्यापैकी ३ काडतूसं वापरून त्याने ३ लोकांचा जीव घेतला होता. उरलेली ७ काडतूसं तो आपल्यासोबत घेऊन फिरत होता. विनाकारण आणि कोणत्याही ओळखीशिवाय समोर येणाऱ्याच्या कानशिलाला बंदूक लावून गोळी झाडण्याची त्याची सनक मोठी होती. ७ काडतूसं शिल्लक असणे, याचा अर्थ तो आणखी ७ जणांना मारण्याच्या तयारीत होता, असा पोलिसांचा अंदाज आहे.
लष्करातील जवानाचा 'सायको किलर' कसा झाला?
४५ वर्षीय गुरप्रीत सिंह पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातील रहिवासी होता. २००६ मध्ये तो लष्करात भरती झाला आणि १५ वर्षांच्या सेवेनंतर २०२१ मध्ये निवृत्त झाला. निवृत्तीनंतर तो गावात परतला, पण तिथे त्याला नैराश्याने ग्रासले. लष्करात असताना दाढी आणि पगडीमध्ये राहणारा हा जवान निवृत्तीनंतर पूर्णपणे बदलला. त्याने केस कापले, दाढी काढली आणि तो दारूच्या आहारी गेला.
लष्करातून बाहेर पडल्यानंतर त्याला कोलकाता आणि बिहारमधील आरा येथील बँकांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी मिळाली, पण त्याच्या व्यसनामुळे आणि भांडखोर स्वभावामुळे त्याला तिथून काढून टाकण्यात आले. नोकरी सुटल्याच्या याच रागातून त्याच्यातील सायको किल जागा झाला.
सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे!
गुरप्रीतच्या बॅगेत एक रिव्हॉल्व्हर आणि एक दुहेरी नळीची बंदूक होती. त्याने बंदुकीची नळी कापली होती जेणेकरून ती बॅगेत सहज मावेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मुगलसराय (पंडित दीन दयाल उपाध्याय) सारख्या मोठ्या जंक्शनवर मेटल डिटेक्टर आणि आरपीएफचे जवान त्याला पकडू शकले नाहीत. तो रात्रभर स्टेशनवर शस्त्रांसह फिरत राहिला आणि ट्रेनमध्ये हत्या केल्या.
"त्याला स्वतःलाच माहित नव्हतं तो काय करतोय"
वाराणसी परिक्षेत्राचे डीआयजी वैभव कृष्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरप्रीतची चौकशी केली असता त्याने या हत्यांमागे कोणतेही ठोस कारण सांगितले नाही. "त्याला नेमके कुठे जायचे आहे हे सुद्धा स्पष्ट नव्हते. जो समोर आला, त्याला त्याने गोळी घातली," असे डीआयजींनी सांगितले. पोलीस कोठडीत असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, ज्यात पोलिसांच्या गोळीबारात त्याचा अंत झाला.