महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांचा तराफ्यावरून जीवघेणा प्रवास; प्रशासनाची कोणतीही तयारी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 19:32 IST2026-02-15T19:32:10+5:302026-02-15T19:32:37+5:30
हजारो भाविकांनी तराफ्याच्या मदतीने घेतले दर्शन.

महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांचा तराफ्यावरून जीवघेणा प्रवास; प्रशासनाची कोणतीही तयारी नाही
केदारखेडा (जालना) : भोकरदन तालुक्यातील वालसा-खालसा येथील गिरजा-पूर्णा संगमेश्वर मंदिरातमहाशिवरात्रीनिमित्त भाविकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. या मंदिराजवळच गिरजा व पूर्णा नद्यांचा संगम होत असून, तेथे भोलेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त येथे मोठी यात्रा भरते आणि मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजून जातो. मात्र, यावर्षी नदीत पाणी असल्याने पारंपरिक मार्ग वापरणे अशक्य झाले. त्यामुळे वालसा गावातून तराफ्यावरून जीवघेणा प्रवास करीत ३ हजार भाविकांनी दर्शन घेतले.
केदारखेडा, मेरखेडा, देऊळगाव ताड, टाकळी, जवखेडा, नळणी, आदी गावांतील भाविकांनी या तराफ्यावरून जीवघेणा प्रवास करून संगमेश्वर मंदिर गाठले. स्थानिक स्वयंसेवकांनी या तराफ्याची व्यवस्था केली होती, जेणेकरून भाविक सुरक्षितपणे नदी पार करू शकतील. भक्तांच्या जीवघेणा प्रवासाची प्रत्यक्ष दृश्ये पाहून अनेकांना धक्का बसला. नदीवरून हा मार्ग काही ठिकाणी उंचीवरून खड्यांतून जात असल्याने जोखीम खूप होती. तरीही भाविकांची भक्ती भाव पाहून स्वयंसेवकांचे प्रयत्न यशस्वी ठरले.
नदीपार प्रवास भक्तांसाठी धैर्याचा अनुभव
मंदिरावर दर्शनासाठी येणे हे श्रद्धेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तरीही प्रशासनाने नदीपार मार्ग आणि गर्दीसाठी काही उपाययोजना केली असती, तर भक्तांना अधिक सुरक्षितता मिळाली असती, असे स्थानिक भाविकांनी सांगितले. स्थानिक प्रशासनाने याठिकाणी कोणतीही व्यवस्था केलेली नव्हती, त्यामुळे तराफ्याच्या मार्गावर येणाऱ्या धोक्याची जबाबदारी मुख्यत्वे स्वयंसेवकांकडे होती. यंदा महाशिवरात्रीनिमित्त गिरजा-पूर्णा संगमेश्वर मंदिराजवळील नदीपार प्रवास हा भक्तांसाठी आठवणींचा आणि धैर्याचा अनुभव ठरला. भाविकांनी आपली श्रद्धा प्रकट करीत मंदिरात पूजन केले.
दर्शनासाठी भाविकांची कसरत
वालसा खालचा मार्गे संगमेश्वर मंदिरावर जाण्यासाठी भाविकांना १० किलोमीटरचा फेरा पार करावा लागला. घारगाव पाटी ते संगमेश्वर मंदिराचा सहा किलोमीटरचा कच्चा व पूर्णपणे उघडलेला रस्ता असल्याने भाविकांना जास्त कसरत करावी लागली आणि अनेकांचे हाल झाले.
यात्रा भरते यांची कल्पनाच नाही
यात्रेसंदर्भात प्रशासनाने काही तयारी केली आहे का, हे जाणून घेण्यासाठी तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांशी मोबाइलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. तर या ठिकाणी यात्रा भरते यांची कल्पनाच नसल्याचे तलाठी अमोल तळेकर यांनी सांगितले.