जड वाहनांना औट्रम घाट बंद, अर्थकारणाला 'ब्रेक'; दक्षिण-उत्तर भारत कनेक्टिव्हीटीही कोलमडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 19:26 IST2026-05-05T19:26:01+5:302026-05-05T19:26:52+5:30
औट्रम घाट बंद असल्याने पेट्रोल पंप, हॉटेल आणि गॅरेज व्यवसायावर गदा; जड वाहनांची लांबून वळवावळव.

जड वाहनांना औट्रम घाट बंद, अर्थकारणाला 'ब्रेक'; दक्षिण-उत्तर भारत कनेक्टिव्हीटीही कोलमडली
- विकास राऊत
छत्रपती संभाजीनगर : कन्नडमार्गे चाळीसगावकडे जाणाऱ्या व येणारा राष्ट्रीय महामार्ग २११ वर असलेल्या औट्रम घाटातील ११ किलोमीटर अंतरात वाहतूक खोळंबत असल्याने तो अडीच वर्षांपासून बंद असून याचा थेट परिणाम जिल्ह्यासह इतर भागांतील अर्थकारणावर झाला आहे. बोगद्याच्या कामाला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे तलवाडा घाटातून जड वाहतूक वळविली. तो मार्गही उखडला असून अपघातांचे प्रमाण वाढल्याने रस्त्याचे दुरुस्ती काम सुरू असल्याने तो मार्गही अद्याप पूर्णत: खुला झालेला नाही.
तलवाडा घाटातील मार्गाची दुरुस्ती सुरू असल्याने सुमारे ४ हजारांहून अधिक जड वाहने (ज्यामध्ये उद्योगांचा कच्चा-पक्का माल, जीवनावश्यक वस्तू असतील) लांबून वळसा घालून शहरात येत असून दक्षिण व उत्तर भारत ही व्यापार कनेक्टिव्हीटी पूर्णत: कोलमडली आहे. ऑगस्ट २०२३ पासून घाटही जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे मार्गावरील पेट्रोल पंप, हॉटेल, गॅरेजच्या व्यवसायावर गदा आली आहे. घाटाच्या पलीकडून येणारा भाजीपाला कन्नड व छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येणे बंद आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे अर्थकारणही कोलमडले आहे.
उत्तर भारताशी कनेक्टिव्हिटी...
घाट उतरल्यानंतर धुळेमार्गे पुढे गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरयाणा या राज्यांची कनेक्टिव्हिटी मिळणारे मार्ग आहेत तर, घाटातून मराठवाड्यासह, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिणेत व्यापारी बाजारपेठांकडे जाण्याचे मार्ग आहेत. घाट बंद असल्यामुळे लांबवरून वाहतूक वळली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये येण्याऐवजी नाशिक अथवा अहिल्यानगरच्या दिशेने अर्थकारणाशी निगडित वाहतूक जात असल्याचे दिसते आहे.
नांदगाव-मालेगाव-येवला-वैजापूरमार्गे वाहतूक
औट्रम घाटाचा पर्यायी रस्ताही खराब झाल्याने त्याची दुरूस्ती सुरू आहे. रस्ता दुरुस्तीसाठी नांदगाव-मालेगाव-येवला-वैजापूर या मार्गावरून जड वाहतूक वळविण्यात आली. १३ कि.मी.चा औट्रम घाट बंद असल्यामुळे शहराच्या अर्थकारणाशी निगडित सर्व वाहतूक ५० कि.मी. लांबून वळविली आहे. नांदगावमार्गे वाहने वैजापूरला आल्यानंतर ती लासूरमार्गे छत्रपती संभाजीनगर किंवा समृद्धी महामार्गाने छत्रपती संभाजीनगरात येत आहेत. नांदगाव-शिऊर बंगला हा मार्ग दुरुस्तीचे काम एमएसआयडीसीने हाती घेतले आहे.
आर्थिक उलाढालीस ‘ब्रेक...’?
अडीच वर्षे होत आले आहेत, सोलापूर-धुळे हायवेवरील टोलचे उत्पन्न घटले आहेच, शिवाय वाहनांना नवीन मार्गांची सवय लागली तर घाटातील मार्गाने वाहतूक सुरळीत होण्यास खूप वर्षे लागतील. या काळात मोठे नुकसान होईल.
- विश्वदीप करंजीकर, पेट्रोल पंपचालक
औट्रमच्या डीपीआरचे काम सुरू आहे...
औट्रम घाटात बोगदाच्या डीपीआरचे काम सध्या सुरू आहे. ऑक्टोबर २०२६ पर्यंत निविदा अंतिम होतील, या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत. इतर एनओसी मिळाल्या आहेत, काही एनओसी बाकी आहेत.
-अमरिश मानकर, प्रकल्प संचालक एनएचएआय