अनास्था! छत्रपती संभाजीनगर-नागपूर रेल्वे कनेक्टिव्हिटीच नाही, २४ तास ११४ ट्रॅव्हल्सचेच ‘राज’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 20:23 IST2026-04-21T20:22:52+5:302026-04-21T20:23:21+5:30
छत्रपती संभाजीनगर-नागपूर मार्गावर प्रवाशांचे प्रचंड हाल; ट्रॅव्हल्ससाठी १८०० रुपयांपर्यंत मोजावे लागतेय तिकीट.

अनास्था! छत्रपती संभाजीनगर-नागपूर रेल्वे कनेक्टिव्हिटीच नाही, २४ तास ११४ ट्रॅव्हल्सचेच ‘राज’
संतोष हिरेमठ
छत्रपती संभाजीनगर : नागपूर हे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आणि 'ऑरेंज सिटी' (संत्रा नगरी) म्हणून प्रसिद्ध असलेले विदर्भातील प्रमुख शहर आहे. तर, छत्रपती संभाजीनगर राज्याची पर्यटन राजधानी. परंतु, आजघडीला छत्रपती संभाजीनगरातून नागपूरसाठी एकही रेल्वे धावत नाही. त्याच वेळी शहरातून नागपूरसाठी एक, दोन नव्हे तर २४ तासांत ११४ ट्रॅव्हल्स धावतात. त्यातूनच नागपूरला जाण्यासाठी प्रवाशांना खिसा रिकामा करावा लागतो.
संभाजीनगर आणि नागपूर या दोन्ही महत्त्वाच्या शहरांदरम्यान दररोज शेकडो नागरिक प्रवास करतात. शिक्षण, रोजगार, आरोग्य सेवा आणि प्रशासकीय कामांसाठी नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. इतक्या महत्त्वाच्या मार्गावर आजघडीला एकही रेल्वे सेवा उपलब्ध नाही. बाब आश्चर्यकारक आणि चिंताजनक आहे. रेल्वेचा पर्याय नसल्याने प्रवाशांना पूर्णपणे खाजगी ट्रॅव्हल्सवर अवलंबून राहावे लागत आहे. सध्या संभाजीनगरातून नागपूरसाठी तब्बल २४ तासांत ११४ ट्रॅव्हल्स बस धावतात. थेट शहरातून आणि इतर शहरातून येऊन छत्रपती संभाजीनगरमार्गे धावणाऱ्या या ट्रॅव्हल्स आहेत. विशेष म्हणजे या सर्व ट्रॅव्हल्समध्ये बुकिंग होत असून, दिवस-रात्र या बसची ये-जा सुरू असते. शहरातील विविध भागांतून बस सुटताना दिसतात आणि प्रवाशांनी भरून धावतात. मात्र, या नागपूरसाठी एकही थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसणे ही संभाजीनगरासाठी गंभीर बाब ठरत आहे.
महागडा प्रवास
नागपूरसाठी बसचे तिकीट दर साधारण ७०० ते १ हजार ८०० रुपयांदरम्यान आहेत. रेल्वेच्या तुलनेत हा खर्च अधिक असल्याने विद्यार्थ्यांसह नोकरदारांवर आर्थिक ताण वाढत आहे. नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी हा खर्च मोठा ठरत आहे.
३ रेल्वेंची कनेक्टिव्हीटी तोडली
नागपूरसाठी संभाजीनगरांसाठी धनबाद- कोल्हापूर दीक्षाभूमी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस अजनी एक्स्प्रेस महत्त्वपूर्ण ठरत होत्या. परंतु, कोराना काळात या रेल्वेंची कनेक्टिव्हीटी तोडण्यात आली. तर, नागपूर एक्स्प्रेसही आजघडीला बल्लारशाहपर्यंतच धावत आहे.
राजकीय अनास्था
मुख्यतः मध्य आणि दक्षिण मध्य रेल्वे या विभागलेल्या महाराष्ट्रात, या झोनमधील समन्वयाचा अभाव, राजकीय अनास्थेमुळे रेल्वे कनेक्टिव्हीटी कमकुवत आहे. संभाजीनगर आणि उपराजधानी नागपूर स्वातंत्र्यानंतर अजूनही नियमित रेल्वे सेवेने जोडले गेलेले नाही. यावर लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र एका रेल्वे झोनअंतर्गत आणून राज्यांतर्गत रेल्वे कनेक्टिव्हीटी वाढवावीत, अशी मागणी आहे.
-डॉ. स्वानंद सोळंके, मराठवाडा रेल्वे कृती समिती.