“विमान अपघातावर संशय येणं साहजिक; चौकशी अहवाल येईल”; अजितदादांच्या विमान अपघातावर चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 12:50 IST2026-02-03T12:37:49+5:302026-02-03T12:50:26+5:30
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी अनेकांनी संशय व्यक्त केला, या प्रकरणी आता भाजपा नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

“विमान अपघातावर संशय येणं साहजिक; चौकशी अहवाल येईल”; अजितदादांच्या विमान अपघातावर चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले. या अपघात प्रकरणी उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. अनेकांनी या अपघातावर संशय व्यक्त केला असून चौकशी करण्यात अशी मागणी केली आहे. दरम्यान, आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मोठ्या राजकीय व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर संशय व्यक्त होणं हे साहजिक असल्याचं मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. ते सांगली येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Latest Marathi News LIVE: पुण्याचे महापौर, उपमहापौर ठरले; भाजपकडून घोषणा
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “जेव्हा जेव्हा एखाद्या राजकीय व्यक्तीचा अपघात होतो आणि त्यामध्ये मोठी राजकीय व्यक्ती दगावतो, तेव्हा नातेवाईकांमध्ये आणि विरोधकांमध्ये संशय निर्माण होतो. त्या संदर्भातील चर्चा होणं चुकीचं नाही.” या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून सखोल चौकशीची मागणी केली असून, या प्रकरणाचा अहवाल लवकरच समोर येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
"सत्य बाहेर येण्यासाठी चौकशी आवश्यक असून, अहवाल आल्यानंतर सर्व बाबी स्पष्ट होतील, असंही पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्याशी असलेल्या संबंधांवरही भाष्य केलं. “माझे आणि अजितदादांचे संबंध अत्यंत चांगले होते. सांगली महापालिकेसाठी आम्ही दोघे एकत्र बसून सत्तेचं विभाजन कसं करायचं, यावर चर्चा केली होती. ती चर्चा सांगलीच्या दृष्टीने सकारात्मक ठरली होती,” असं ते म्हणाले. निवडणुकांच्या काळात राजकीय टीका होत असली, तरी ‘रात गई, बात गई’ अशी भूमिका दोघांचीही होती, असंही पाटील यांनी नमूद केलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारला असता पाटील यांनी मिश्किल उत्तर दिलं. “मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे. या विषयावर बोलण्याइतका मी मोठा नाही. त्यामुळे या प्रकरणात मी लक्ष घालत नाही,” अशी टिप्पणी त्यांनी केली.