बारामती तालुक्यातील २४ गावांत पाणीटंचाई, काही ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 20:03 IST2026-05-16T20:03:09+5:302026-05-16T20:03:18+5:30
प्रामुख्याने शेतकऱ्यांकडे असलेल्या दुग्ध व्यवसाय पाणीटंचाईमुळे अडचणीत आला आहे

बारामती तालुक्यातील २४ गावांत पाणीटंचाई, काही ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू
मोरगाव : बारामतीच्या अनेक गावांत सध्या तीव्र उन्हाचा तडका आहे. यांसह नागरिकांना पिण्यासाठी पाणीटंचाई जाणवत आहे. प्रशासनाच्या वतीने संपूर्ण आढावा घेण्यात आला असून काही ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले. तर अनेक गावांच्या मागणी प्रस्ताव तयार आहेत. सध्या २४ गावांत पाणी टँकरची मागणी आहे. बारामतीच्या पश्चिम जिरायती भागात ही समस्या अधिक तीव्र आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांकडे असलेल्या दुग्ध व्यवसाय पाणीटंचाईमुळे अडचणीत आला आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे मागणी केल्याने दिवस सुरू आहे. यापैकी काही गावांत शासनाच्या वतीने पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत.
बारामती पंचायत समिती व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त पुणे त्यांचा आढावा घेण्यात आला. दिनांक ५ मे २०२६ ते ११ मे २०२६ या कालावधीत गाडीखेल, सोनवडी सुपे, देऊळगाव रसाळ, अंजनगाव, थोपटेवाडी, कारखेल, सावळ, जैनकवाडी व मोराळे या नऊ गावांना टँकर सुरू करण्यात आला आहे. यानंतर गोजुबावी, उंडवडी क.प., जराडवाडी, जळगाव सुपे या गावांच्या पाणी टँकर मागणीचे प्रस्ताव मंजुरीसाठी दिनांक १२ व १३ मे २०२६ रोजी सादर करण्यात आले आहेत. तसेच खराडेवाडी, नारोळी व कोळोली या गावांचे प्रस्ताव तयार आहेत. हे सर्वच गावात सध्या पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील आंबी खुर्द, लोणी-भापकर, शिरसुफळ भोंडवेवाडी, निंबोडी, मोढवे, साबळेवाडी यांसह चोपडज इत्यादी गावांत नागरिकांना पिण्यासाठी पाणी टँकर सुरू करावेत, अशी स्थिती आहे. नागरिकांची मागणी व वस्तुस्थिती लक्षात घेऊन पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर माने यांनी सांगितले.
- टंचाईग्रस्त २४ गावांचा आढावा घेण्यात आला आहे.
- सध्या ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
- एकूण ९ गावे आणि ५४ वाड्या-वस्त्यांच्या ठिकाणी पाणी पुरवले जाते.
- नवीन ४ गावांना टँकर सुरू करण्याची मागणी पुढे पाठवली आहे.