पर्यटकांचा बेशिस्तपणा; सुरक्षेबाबत अभाव, गडकिल्ल्यांवर निष्काळजी फिरणे ‘जीवघेणे’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 11:48 IST2026-04-21T11:47:10+5:302026-04-21T11:48:07+5:30
गडकिल्ल्यांवर अडचण आल्यास (एमएमआरसीसी) या संस्थेच्या हेल्पलाइन क्रमांक 7620230231 यावर संपर्क साधावा

पर्यटकांचा बेशिस्तपणा; सुरक्षेबाबत अभाव, गडकिल्ल्यांवर निष्काळजी फिरणे ‘जीवघेणे’!
पुणे : डोंगर-दरी, किल्ले, धरण अशा भागात जाऊन फिरण्याचे ‘फॅड’सर्वांमध्येच पहायला मिळत आहे. पण त्यामुळे अनेक जण योग्य काळजी न घेता अनोळखी ठिकाणावर पर्यटनासाठी जातात आणि अडचणीमध्ये सापडतात. ऐनवेळी मदत न मिळाल्याने मग त्यांना जीव गमवावा लागतो. गतवर्षी अशा घटनांमध्ये ३२ जणांचा प्राण गेला, तर शेकडो जणांना रेस्क्यू करण्यात यश आलेले आहे. एकट्याने खडतर भागात जाऊ नये, गेले तर योग्य काळजी घ्यावी, हेल्पलाइन नंबरवर कॉल करावा, असे आवाहन बचाव संस्थांकडून करण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. सह्याद्रीचा परिसर असल्याने तो ट्रेकिंग करणाऱ्यांना नेहमीच खुणावत असतो. त्यात एकट्याने पर्यटन करण्याचा ट्रेंडच आला आहे. तो करत असताना अनेक जण फोटो काढतात, रील्स करतात आणि अवघड ठिकाणीदेखील जातात. त्यातून मग आपत्कालीन स्थिती निर्माण होते. त्या भागात बचाव पथकाशी संपर्क झाला तर त्या संबंधित पर्यटकाचा प्राण वाचतो, अन्यथा अनेकांना जीव गमवावा लागतो.
बचाव पथकातील कर्मचाऱ्यांच्या मते, पर्यटकांचा बेशिस्तपणा, सुरक्षेबाबत अभाव, स्थानिक परिसराची माहिती नसणे आणि पाण्याच्या ठिकाणी मूलभूत सुरक्षा किंवा पायाभूत सुविधांची कमतरता असणे, या सर्व गोष्टींमुळे अपघात होत असतात. सध्या तर या घटनांमध्ये वाढच झालेली पहायला मिळते.
प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे. परंतु, त्यांच्याकडे अशा अपघातांची एकत्रित माहिती उपलब्ध नाही. कारण स्थानिक भागात अनेक खासगी बचाव पथक कार्य करत आहेत. त्यामुळे माहितीचे एकत्रीकरण होत नाही. घटनेच्या स्वरूपानुसार, तालुका स्तरावर, स्थानिक पोलिस ठाण्यांमार्फत किंवा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयामार्फत नोंदी ठेवल्या जातात. त्या एकत्र केल्या तर सर्व घटनांची माहिती मिळू शकेल, अशी मागणी होत आहे.
वाइल्डलाइफ प्रोटेक्शन मावळ ऑर्गनायझेशन, आपला मित्र मावळ आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा या तीन बचाव गटांनी संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान १५ हून अधिक लोकांचा बुडून मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतांश घटना पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील आणि आसपासच्या भागांतून नोंदवण्यात आल्या आहेत.
पाण्यात बुडण्याच्या घटनांमागे अनेक घटक कारणीभूत आहेत, ज्यामध्ये पाण्याची खोली माहिती नसणे, अचानक खोल उतारात पडणे, गाळात किंवा चिखलात अडकणे, अनोळखी ठिकाणी जाताना गांभीर्यपूर्वक याकडे लक्ष दिले जात नाही. तसेच अनेकदा मद्यप्राशन करून पाण्यात उतरणे अशा गोष्टींमुळे अपघात होत आहेत. -तानाजी भोसले, हवेली आपत्ती व्यवस्थापन समिती
जानेवारी २०२५ - डिसेंबर २०२५
MMRCC हेल्पलाइनवर आलेले कॉल: ११२
रेस्क्यू केले गेलेल्या व्यक्तींची संख्या: ९५
अपघात होऊन मृत झालेल्या व्यक्तींची संख्या: ९
अपघात होऊन जखमी झालेल्या व्यक्तींची संख्या: ४०
ओढे, नाले, धारण, धबधबे यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या: ३२
अडचणीत असाल तर इथे कॉल करा!
‘Maharashtra Mountaineers Rescue Coordination Centre’ (एमएमआरसीसी) या संस्थेकडून हेल्पलाइनच्या 7620230231 या क्रमांकावर संपर्क साधावा. त्यांच्याकडून त्वरित मदत करण्यात येते. हा राज्यासाठीची हेल्पलाइन आहे. त्यामुळे भटकंती करणाऱ्यांसाठी हा क्रमांक महत्त्वाचा आहे, अशी माहिती सेंटरचे राहुल मेश्राम यांनी ‘लोकमत’ला दिली.
चौसष्ट वर्षीय ट्रेेकर २५० फूट दरीत!
तोरणा किल्ल्यावरून २५० फूट खोल दरीत एक ६४ वर्षी ट्रेकर रविवारी (दि.१९) पडले. या घटनेची माहिती वेल्हे पोलिस स्टेशनला मिळाल्यावर तत्काळ वेल्हे पोलिस स्टेशनचे अधिकारी अमित देशमुख व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक रेस्क्यूचे तानाजी भोसले यांच्या टीमने त्यांना सुखरूप वर काढले.