“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 13:24 IST2026-04-21T13:24:15+5:302026-04-21T13:24:29+5:30
Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे म्हणाले की, बंगालमध्ये बंगली एकवटले आहेत, तामिळनाडूत तमिळ एकवटले आहेत आणि महाराष्ट्रात मराठी...

“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
Uddhav Thackeray News: मला कल्पना आहे की, इथे कोणाचेही माझ्याकडे लक्ष नाही. टाळ्याही वाजणार नाहीत, याचीही कल्पना आहे. कबड्डी स्पर्धेचे आयोजन केल्याबाबत शिवसैनिकांचे अभिनंदन करतो. संजय राऊत हे म्हणाले की, खरी आयपीएल इथे सुरू आहे आणि जल्लोषही तसाच आहे. जोशही तसाच आहे. फक्त एकच फरक आहे, तो म्हणजे आयपीएलमध्ये कोणता खेळाडू कधी कोणत्या संघात असतो, ते कळत नाही, अशी टोलेबाजी उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. कबड्डी स्पर्धेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
मागेही एकदा बोललो होतो की, अनेकदा आपण टीव्हीवर मॅच पाहत असताना, आपण म्हणतो की, अरे हा आपला खेळाडू आहे. आता तो त्या संघातून खेळतो आहे. कारण तिकडेही बोली लागते. हल्ली राजकारणातही बोली लागायला लागलेली आहे. ज्यांची बोली अधिक, तिकडे खेळाडू जातात. परंतु, या कबड्डीत तसे नाही. कबड्डीत एक संघभावना आहे. अनेक वर्षांनी कबड्डीचा सामना पाहत आहे. कबड्डीत चपळाई हवी, ताकद हवी, केवळ तंगडी पकडून चालत नाही, तर डोकेही वापरावे लागते, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातही मराठी माणूस एकटवल्याशिवाय राहणार नाही
आम्ही राजकारणी फक्त एकमेकांच्या तंगड्यात तंगडे घालतो. मला आनंद आहे की, विक्रोळी, भांडुप, या भागातील लोकांनी आपला भगवा आणि मराठी ठसका कायम ठेवला आहे. बंगालमध्ये बंगली एकवटले आहेत, तामिळनाडूत तमिळ एकवटले आहेत. येथील जोश पाहिला तर मला असे वाटते की, महाराष्ट्रातही मराठी माणूस एकटवल्याशिवाय राहणार नाही. आपला जो भगवा आहे, त्याचे तेज तुम्ही कायम ठेवले, याबाबत तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, असे ठाकरे म्हणाले.
दरम्यान, परंपरा म्हणून अशा स्पर्धा पुढे सुरू ठेवाव्यात. हळूहळू मैदानी खेळ कमी होत चालले आहेत. मैदानेही कमी होत चालली आहेत. आपण नाही तर दुसरे कोण वाचवणार, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली.